BJP and Congress Sarkarnama
मराठवाडा

Lok Sabha Election 2024 : लातूरसाठी महायुतीत स्पर्धा; तर काँग्रेसकडे उमेदवाराची वानवा...

Jagdish Pansare

Latur News: लातूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवार कोण असणार, याबाबत उत्सुकता असली तरी उमेदवारी जाहीर करण्याची पक्षाला फारशी घाई दिसत नाही. जिल्हा पातळीवरून पक्षश्रेष्ठीकडे कोणाच्या उमेदवारीसाठी शिफारस होणार, याकडे लक्ष लागले आहे. मराठवाड्यातील काँग्रेसचे बडे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीच पक्षाला सोडचिठ्ठी देत विरोधकांच्या तंबूत एन्ट्री केल्याने आधीच चिंतेत असलेल्या काँग्रेसची चिंचा अजूनच वाढली आहे. (Lok Sabha Election 2024)

नांदेड आणि लातूर हे शेजारचे जिल्हे असले तरी देशमुख आणि चव्हाण यांच्यात विलासराव देशमुखांच्या काळापासून फारसे सख्य कधीच नव्हते. आता चव्हाण भाजपमध्ये गेल्याने मराठवाड्यातील काँग्रेस पक्षाची सूत्रं पुन्हा लातूरच्या देशमुखांच्या हाती येतात का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या सगळ्या राजकीय घडामोडीत दोन महिन्यांवर आलेल्या लातूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी घेण्यास फारसं कोणी इच्छुक दिसत नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आरक्षित मतदारसंघ असल्यामुळे काँग्रेसला याआधी 2009 मध्ये उमेदवार बाहेरून आयात करावा लागला होता. तरीही विलासराव देशमुख यांचे नेतृत्व असल्यामुळे तेव्हा काँग्रेसने विजय मिळवला होता. मात्र, विलासराव यांच्या नंतर राज्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणातही देशमुख बॅकफूटवर गेले आहेत. शिवाय काँग्रेसच्या ज्या बड्या नेत्यांचा लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये समावेश होण्याची चर्चा आहे, त्यात अमित, धीरज या देशमुख आमदार बंधूंची नावेही समोर येत होती.

दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या सर्व महत्त्वाच्या बैठकांना हजेरी लावणारे अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला. त्यामुळे आता मराठवाड्यात लोकसभेसाठी उमेदवार देताना आणि नवे नेतृत्व निर्माण करताना काँग्रेसचे देशपातळीवरचे नेते ताकही फुंकून घेण्याच्या मनस्थितीत आहेत.

लोकसभा निवडणुकीत उतरण्याआधीच राज्यातील महाविकास आघाडीला अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याने धक्का बसला. त्यामुळे लातूरमध्ये उमेदवारीसाठी फार मोठी स्पर्धा आहे, असे चित्र नाही. त्यामुळे उमेदवारी लादावी लागेल, अशीच काहीसी परिस्थिती आहे.

लातूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देशमुखांवर द्यावी, अशी मागणी काँग्रेसच्या विभागीय बैठकीत करण्यात आली होती. या संदर्भात अजून पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेतलेले नाही. त्यामुळे विभागीय बैठकीनंतर जिल्हा काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा मरगळ आल्यासारखी परिस्थिती आहे. लातूर लोकसभा मतदारसंघ हा परंपरागत काँग्रेसचा मतदारसंघ राहिला आहे. मात्र, मागील सतत दोन निवडणुकीत इथे भाजपला यश मिळाले आहे.

काँग्रेसकडून या दोन्ही निवडणुकीत उसने अवसान आणून निवडणूक लढवण्यासारखा प्रकार होत आहे. जिल्ह्यात चाकूरकर, निलंगेकर व देशमुख असे गट असले तरी या सर्वच गटाने एकसंध काम करणे गरजेचे आहे. काँग्रेसचा उमेदवार जाहीर झाला तरी निवडणुकीची जबाबदारी कोण घेणार ? हे महत्त्वाचे आहे. काँग्रेसच्या विभागीय मेळाव्यात खुद्द निलंगेकर गटाने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्यावर निवडणुकीची जबाबदारी सोपवावी, अशी मागणी केली.

त्यामुळे आता पक्षश्रेष्ठी लोकसभा निवडणूक कोणाच्या नेतृत्वाखाली घेणार हे पाहावे लागेल. सध्या देशभर भाजपचे वारे वाहू लागले आहे, राज्यातही सत्ता परिवर्तनाच्या अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. काँग्रेस पक्षाचीही मोठी पडझड होत असताना आता स्वतःहून उमेदवारीसाठी कुणी फारसा आग्रह धरताना दिसत नाही. उमेदवारी जाहीर झाली तरी विश्वासाने सर्वच नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते काम करतील का ? अशी शंका उपस्थितीत केली जात आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT