narendra modi sarkarnama
मराठवाडा

Sharad Pawar News : "कधी नेहरू, तर कधी राहुल गांधींवर टीका, पंतप्रधान म्हणून तुम्ही काय केलं?" पवारांचा मोदींना सवाल

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : तिकडे पंतप्रधान नरेंद्र ( Narendra Modi ) मोदी नांदेड, परभणीच्या आपल्या सभेतून काँग्रेस, इंडिया आघाडीवर हल्लाबोल करत होते, तर इकडे संभाजीनगरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी मोंदीचा उल्लेख 'भाजपचे प्रधानमंत्री' असा करत टोला लगावला. पंडित नेहरू, राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यापेक्षा पंतप्रधान म्हणून तुम्ही काय केले? हे लोकांना सांगा. महागाई कमी करू, असे आश्वासन देत तुम्ही सत्तेवर आला. मग, महागाई कमी होण्याऐवजी वाढली का? याचे उत्तर द्या, अशी टीका शरद पवार यांनी केली.

छत्रपती संभाजीनगर ( Chhatrapati Sambhajinagar ) व जालना लोकसभा मतदारसंघाचे ( Jalna Lok Sabha Constituency ) महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे ( Chandrakant Khaire ), डॉ. कल्याण काळे ( Kalyan Kale ) यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी मोदींवर ( Narendra Modi ) निशाणा साधला. लोकशाही आणि जनतेचे मूलभूत हक्क राखायचे असतील, तर मतपेटीतून सत्ताधाऱ्यांना उत्तर द्यावे लागेल. सध्या जो कोणी विरोधात बोलेल त्याला तुरुंगात टाकले जात आहे, असंही पवारांनी म्हटलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"आज मूलभूत अधिकार, संसदीय लोकशाही संकटात आली आहे. पंतप्रधानांच्या विरोधात बोलणाऱ्या आदिवासी राज्यातील मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक करण्यात आली. टीका केली तर राज्यकर्त्यांना तुरुंगात टाकले जात आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले. या विरोधात उभे राहण्याची गरज आहे. देशातील परिस्थिती आणि राजकारण वेगळ्या दिशेने चालले आहे, त्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी देशपातळीवर 'इंडिया' आघाडी केली," असं सांगत पवारांनी पंतप्रधान मोदी यांनी नांदेड, परभणीत केलेल्या भाषणाचा उल्लेख केला.

"इथे येण्यापूर्वी मी मोदीसाहेबांचे भाषण ऐकत होतो. प्रधानमंत्री हा देशाचा असतो, मात्र भाषण ऐकल्यावर असे वाटले की, ते 'भाजपचे पंतप्रधान' आहेत. त्यांनी राष्ट्रीय दृष्टिकोन ठेवला पाहिजे," असा टोला पवारांनी लगावला. "माझ्या हातात सत्ता द्या पन्नास दिवसांत महागाई कमी करू, असा शब्द पंतप्रधान मोदींनी दिला होता. पण, महागाई कमी करण्याऐवजी वाढतच गेली. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या," असं पवारांनी सांगितलं.

"देशात आज बेरोजगारांची संख्या वाढली आहे. मात्र, याकडे लक्ष देण्याऐवजी पंतप्रधान कधी नेहरू, तर कधी राहुल गांधींवर टीका करत आहेत. यापेक्षा तुम्ही देशाचे पंतप्रधान म्हणून काय केले, हे लोकांना सांगितले पाहिजे," असा चिमटाही पवारांनी काढला. "देशातील शेतकरी हवालदिल झाला आहे, त्याच्या मालाला भाव नाही, शेतीसाठी पाणी नाही, जनावरांना चारा नाही ही आजची स्थिती आहे," असं पवारांनी म्हटलं.

"कोट्यवधी तरुणांना नोकऱ्या देणार म्हणून सांगितले. पण, प्रत्यक्षात शंभरपैकी फक्त तिघांना नोकरी मिळते, तर 97 तरुण हाताला काम नाही म्हणून बेरोजगार बनले आहेत. या सरकारला आणि देशाच्या पंतप्रधानांना शेतकरी, बेरोजगार तरुण यांची चिंताच नाही, ते फक्त आपल्या सत्तेत मग्न आहेत," अशी टीकाही पवारांनी केली.


( Edited By : Akshay Sabale )

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT