Eknath Shinde, Devendra Fadanvis, K Chandrashekhar Rao sarkarnama
मराठवाडा

Loksabha Election 2024 : अस्तित्व दाखवण्यासाठी 'बीआरएस' लोकसभेच्या मैदानात

Prasad Shivaji Joshi

Parbhani News : लोकसभा निवडणुकीत विजय किंवा पराजय होण्यापेक्षा मिळालेली मतांची टक्केवारी तेवढीच महत्त्वाची असते. हे सूत्र लक्षात घेऊन भारत राष्ट्र समिती महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहे. यासाठी उमेदवारांची चाचपणी केली जात आहे.

तेलंगणा विधानसभा निवडणुकीत सलग दुसऱ्या वेळेस विजय मिळाल्यानंतर माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या पक्षाने इतर राज्यात पक्ष विस्ताराचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवत सीमोल्लंघन केले. यासाठी तेलंगणा राष्ट्र समिती हे नाव बदलून भारत राष्ट्र समिती असे करण्यात आले. पक्ष विस्तारासाठी महाराष्ट्राची भूमी निवडण्यात आली. पक्षाचे शेतकरीहिताचे धोरण लक्षात घेऊन राज्यातील अनेक शेतकरी नेत्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला.

पक्षाचे नेते के. चंद्रशेखर राव (K Chandrashekhar Rao) यांनी महाराष्ट्रात दौरेही केले. पंढरपूर येथे शक्तिप्रदर्शन करत सभाही घेतल्या. तेलंगणा राज्यात पक्षाने शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या कल्याणकारी योजनांचा प्रचारही जोमात झाला. बीआरएस महाराष्ट्रात तिसरे स्थान मिळवणार अशी शक्यता निर्माण झाली असतानाच तेलंगणा विधानसभा निवडणुकीत पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. त्याचा परिणाम राज्यातील पक्ष विस्तारावर झाला.

अनेक नेत्यांनी काढता पाय घेतला. मात्र, तरीही राज्यातील लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभे करण्याचा निर्णय पक्षाने केला आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांमुळे राज्यात पक्षाचे अस्तित्व दिसून येईल व त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो, अशी पक्षाची स्ट्रॅटेजी असल्याचे पक्षाचे युवा नेते सुधीर बिंदू यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत प्रत्येक प्रादेशिक राजकीय पक्ष एकतर महायुती किंवा महाविकास आघाडीमध्ये जाण्याच्या प्रयत्नात आहे. विशेषतः वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीमध्ये चर्चा चालूच आहे. एमआयएम, वंचित बहुजन आघाडीत सहभागी नसला तरी तेलंगणा ध्ये बीआरएस आणि एमआयएमची युती आहे. त्यामुळे लहान पक्षांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्याचा प्रयत्न बीआरएसकडून केला जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

इतर पक्षातील इच्छुक उमेदवारांवर लक्ष

लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये होत आहे. युती आणि आघाडीतील पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची भली मोठी रांग आहे. युती आणि आघाडीचे उमेदवार जाहीर झाले, की त्या लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार किंवा माजी आमदार यांना बीआरएसच्या वतीने उमेदवारी दिली जाऊ शकते. तसेच शेतकरीहिताचे धोरण असल्यामुळे ग्रामीण भागात पक्षाला पसंती मिळू शकते. तसेच राज्यातील राजकीय नेत्यांनी पक्षबदल केल्यामुळे प्रस्थापित राजकीय पक्षाविषयी मतदारात असलेली नकारात्मक भावना मतपेटीतून व्यक्त केली जाऊ शकते. याचा थेट फायदा बीआरएसला होऊ शकतो.

Edited By : Umesh Bambare

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT