Manoj Jarange Patil  Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांची उपोषण मागे घेताच 'ही' भीष्मप्रतिज्ञा ; सरकारची धडधड राहणार कायम

Deepak Kulkarni

Jalna News : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर नवव्या दिवशी उपोषण मागे घेतले आहे.राज्य सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटी गावात पोहोचलं.या शिष्टमंडळात निवृत्त न्यायमूर्तींसह मंत्री धनंजय मुंडे,मंत्री उदय सामंत,अतुल सावे,संदिपान भुमरे यांचाही समावेश होता.या शिष्टमंडळाला जरांगेंची समजूत काढण्यात यश आलं.

त्यांनी सरकारला मराठा आरक्षणासाठी दोन जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे. पण याचवेळी मनोज जरांगे पाटलांनी सरकारची अडचण वाढवताना मोठं विधान करतानाच सरकारची धडधड कायम राहील याची काळजी देखील घेतली आहे.

मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) २ जानेवारीपर्यंतचा अल्टिमेटम दिल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी सरकारला पुन्हा एकदा अडचणीचा आणणारा निर्णय घेतला आहे. यावेळी जरांगे यांनी आपण उपोषण सोडत असल्याची घोषणा केली खरी पण 2 जानेवारीपर्यंत मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरुच राहणार असल्याचे स्पष्ट केले. याचवेळी त्यांनी आपण इथेच मंडपात आरक्षणासाठी बसू तसेच घराच्या उंबरठ्याला शिवणार नाही अशी भीष्मप्रतिज्ञा मनोज जरांगे यांनी यावेळी घेतली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जरांगे पाटील म्हणाले, सर्वांची दिवाळी गोड झाली पाहिजे.एकाला गोड आणि दुसऱ्याला कडू या मताचा मी नाही.त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासाठी काम करा. वेळ घ्यायचं तर घ्या.पण सगळ्या भावांना आरक्षण द्या, असं ठरलं. त्यांनी ते मंजूर केलं. ही समिती महाराष्ट्रभर काम करेल.अहवाल देईल. आम्ही त्यांना सांगितलं, ही शेवटची वेळ असल्याचा इशाराही त्यांनी सरकारच्या शिष्टमंडळाला दिला. (Maratha Reservation)

...त्यानंतर मुंबईला जाऊन धडकणार!

मनोज जरांगे पाटील यांनी सरकारने जर दोन महिन्यात कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय झाला नाही तर सर्व मराठ्यांनी मुंबईच्या सीमेवर जावून बसावं असं विधान केले आहे. ते म्हणाले.समितीने सरकारला दोन महिन्यात अहवाल द्यायचा.त्यानंतर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरु करावी. महाराष्ट्रातील मागेल त्या गरजवंत मराठा समाजाला गायकवाड अहवाल समितीच्यानुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याचं ठरलं असल्याचेही जरांगे पाटलांनी मराठा बांधवाना सांगितले.

"...अन् मुंडेंची विनंती जरांगे पाटलांनी मान्य केली!"

मराठा आरक्षणाप्रश्नी राज्य सरकार गंभीर असून त्यासाठी 8 डिसेंबर रोजी विशेष अधिवेशन बोलवू असे आश्वासन कृषी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) व त्यांच्यासोबत आलेल्या शिष्टमंडळाने दिले.पण जरांगे पाटील तरीदेखील उपोषणावर ठामच होते. अखेर कृषिमंत्री मुंडेंनी जरांगे पाटलांसमोर थेट हातच जोडले आणि उपोषण मागे घेण्याची विनंती केली.

यावेळी मनोज जरांगे यांनी 24 डिसेंबर की 2 जानेवारीपर्यंत मुदत द्यावी, असं इतर मराठा बांधवांना विचारलं. यावेळी 24 डिसेंबरला होणार नाही साहेब. आणखी आठ दिवस तरी द्या. 2 जानेवारीपर्यंत तरी द्या, असं धनंजय मुंडे म्हणाले. त्यावर मनोज जरांगे यांनी नाही सांगितलं. अहो, आम्ही दोन महिने तुम्हाला देत नाहीत, असं जरांगे म्हणाले.

यावर मंत्री उदय सामंत यांनी मागे तुम्ही दहा दिवस वाढवून दिले होते ना? आता दोन जानेवारीपर्यंतचा वेळ द्या. यानंतर बरीच चर्चा झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी 2 जानेवारीपर्यंत मुदत देण्यास मान्य केलं.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT