Uddhav Thackery, Sharad Pawar, Nana patole  Sarkarnama
मराठवाडा

MVA News : धाराशिवमधील तीन जागांवर 'मविआ'च्या घटक पक्षांची दावेदारी; हायकमांड करणार एक घाव दोन तुकडे ?

Sachin Waghmare

Dharashiv News : नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेमध्ये धाराशिव जिल्ह्यातील चार विधानसभा जागांवर महाविकास आघाडीचे वर्चस्व दिसून येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या तीन पक्षांकडून या जागेवर दावा करण्यात आला आहे. केवळ धाराशिव-कळंब मतदारसंघात ठाकरे गटाचे कैलास पाटील विद्यमान आमदार असल्याने या ठिकाणी इतर पक्षांकडून दावा करण्यात आलेला नाही.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत धाराशिव लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार व विद्यमान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर (Om Rajenimbalkar) यांनी 3 लाख 30 हजार इतक्या मताधिक्याने विजय मिळवला. त्यामुळे धाराशिव लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला मोठे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे आघाडीत सध्या उत्साहाचे वातावरण आहे. (MVA News)

विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने सर्वच पक्षाने आता तयारी सुरू केली आहे. विशेषता उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा (Shivsena) बालेकिल्ला आहे. या ठिकाणी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी हॅट्ट्रिक केली आहे. 2022 मध्ये शिवसेनेत झालेल्या बंडानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटासोबत गेले आहेत. त्यामुळे ते महायुतीकडून निवडणूक लढणार आहेत.

त्यामुळे आता उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटाने त्यांच्या हक्काची जागा असल्याचे सांगत निवडणूक लढण्याचा दावा केला आहे. दुसरीकडे या जागेवर काँग्रेसने दावा केला आहे. आतापर्यंत या मतदारसंघात काँग्रेसने निवडणूक लढवली आहे. एकेकाळी हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. येथील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी ही जागा काँग्रेसलाच मिळायला हवी, अशी आग्रही मागणी तालुका काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

तुळजापूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे राणाजगजीतसिंह पाटील हे आमदार आहेत. याठिकाणी महाविकास आघाडीतील तीनही पक्षाने दावा ठोकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या येथील नेत्यांनी नुकतीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन तुळजापूर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडावा, अशी मागणी केली. दुसरीकडे हा मतदारसंघ काँग्रेसचा असल्याने व याठिकाणी काँग्रेसचे (Congress) मधुकरराव चव्हाण सलग चारवेळा निवडून आल्याने या ठिकाणी काँग्रेसचे इच्छुकांकडून हा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडावा, अशी मागणी केली जात आहे.

तुळजापूर मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकावा, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आता कंबर कसली आहे. हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला मिळावा, यासाठी इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. या मतदारसंघावर आघाडीतील तीन पक्षाचा डोळा दिसत आहे. विशेषता या ठिकाणी खासदार ओमराजे निंबाळकर यांना 52 हजाराची आघाडी आहे.

उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे कैलास पाटील हे आमदार आहेत. त्यांनी ठाकरे गटाच्या पडत्या काळात ठाकरे गटाची साथ सोडली नाही. त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित असून तेच याठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहेत. त्यामुळे या मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटाचा दावा कायम आहे.

भूम-परंडा-वाशी मतदारसंघाची जागा ही शिवसेना उद्धव ठाकरे गटाची होती. येथील आमदार व पालकमंत्री तानाजी सावंत सध्या शिंदे गटासोबत आहेत. त्यामुळे या जागेवर शिवसेना उद्धव ठाकरे गटांनी दावा केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून या मतदार संघावर दावा करण्यात आला आहे. या ठिकाणी खासदार ओमराजे निंबाळकर यांना सर्वाधिक 80 हजाराची आघाडी आहे. त्यामुळे या मतदारसंघावरती महाविकास आघाडीतील दोन पक्षाचे लक्ष आहे.

धाराशिव जिल्ह्यातील या चार जागांवर महाविकास आघाडीतील तीन घटक पक्षाने दावा केला असला तरी याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार आहे. त्यामुळे कोणती जागा कोणाला सुटणार? याचा निर्णय मुंबईत हायकमांडकडे होणार असल्याने सर्वांचे लक्ष या जागावाटपाकडे लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT