Shivsena UBT News : मी खासदार असताना छत्रपती संभाजीनगरचा पाणी प्रश्न कायमस्वरुपी सोडवण्यासाठी साडे सातशे कोटींची पाणी योजना मंजूर करून आणली होती. समांतर जलवाहिनीला तेव्हा विरोध झाला नसता तर आज नागरिकांना चोवीस तास मुबलक पाणी मिळाले असते. पण केवळ मला श्रेय मिळेल म्हणून काही नतद्रष्टांनी योजनेला विरोध केला आणि त्याची माती केली, असा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून (Shivsena UBT) 13 एप्रिलपासून शहरात 'लबाडांनो पाणी द्या' हे जनआंदोलन सुरु केले आहे. रिकाम्या हंड्यांचे तोरण, पाणी अदालत, दिंडी, घरोघरी जाऊन पत्रकांचे वाटप, जनजागृती रॅली अशा विविध पद्धतीने आंदोलन करत पाणी प्रश्नावर आवाज उठवण्याचा प्रयत्न पक्षाने केला आहे. शिवसेनेचे दोन्ही नेते आणि शिवसैनिक पाणी प्रश्नावर आक्रमक झाले असून 16 मे रोजी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मोर्चा काढून या जनआंदोलनचा समारोप केला जाणार आहे.
दरम्यान, या मोर्चाची जय्यत तयारी पक्षाकडून सुरू असून वार्डनिहाय नियोजन बैठका घेतल्या जात आहेत. चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी या बैठकांमधून समांतर जलवाहिनीला विरोध करणाऱ्यांवर टीका करताना दिसत आहेत. संभाजीनगरकरांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठीच आपण खासदार असताना केंद्राकडून समांतर जलवाहिनी योजना मंजूर करून आणली होती. त्यासाठी साडे सातशे कोटींचा निधीही देण्यात आला होता.
परंतु त्यावेळी महापालिकेच्या सत्तेत आमच्या सोबत असलेल्या भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी या पाणी योजनेला विरोध केला. केवळ ही योजना मी आणली होती, ती पूर्ण झाली तर त्याचे श्रेय मला मिळेल या पोटदुखीतून त्यांनी समांतर जलवाहिनी योजनेची माती केली. आज नागरिकांना दहा-पंधरा दिवस पाणी मिळत नाही. ऐन उन्हाळ्यात माता-भगिनींना डोक्यावर हंडे घेऊन वणवण भटकावे लागते. याला ते नतद्रष्ट लोक जबाबदार आहेत, ज्यांनी योजना हाणून पाडली, असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला.
महाविकास आघाडीचे सरकार आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी कोरोना काळातही नव्या पाणी योजनेला वेग देण्याचा प्रयत्न केला. पण यात भाजपाकडून राजकारण केले गेले. तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या आताच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जन आक्रोश मोर्चा काढला होता. सहा महिन्यात पाणी देतो असे सांगून संभाजीनगरकरांची फसवणूक केली होती, असेही खैरे म्हणाले. आता राज्यात अन् केंद्रातही भाजपा महायुतीचे सरकार आहे. मग ते शहरवासियांना पाणी कधी देणार? असा सवालही खैरे यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.