Dharashiv News : धाराशिवचे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे वडील पवन राजेनिंबाळकर व त्यांच्या चालकांची कळंबोली नजीक 20 जून 2006 रोजी हत्या करण्यात आली होती. या घटनेला जवळपास वीस वर्ष झाली आहेत. या हत्याकांडाचा निकाल 14 मे २०२६ रोजी लागणार आहे. या गाजलेल्या प्रकरणात माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 जणांवर आरोप आहेत. मुंबईतील अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश एस आर नावंदर यांच्या कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. त्याचा निकाल पुढील महिन्यात लागणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पवन राजेनिंबाळकर यांच्या हत्येचा खटला तब्बल 20 वर्षांपासून प्रलंबित असल्याने त्यांचे पुत्र ओम राजेनिंबाळकर यांनी अनेकवेळा आपली हतबलता आणि संताप व्यक्त केला. त्यातच आता 20 वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागत असतानाच ओम राजेनिंबाळकर यांनी एका मुलखतीप्रसंगी वेगळीच चिंता अन् खंत व्यक्त केली होती. त्यांचे ते वक्तव्य या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
मुंबईतील अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश एस आर नावंदर यांच्या कोर्टात सोमवारी (ता. 20 एप्रिल) झालेल्या सुनावणीला डॉ पद्मसिंह पाटील यांच्यासह सात आरोपी हजर होते. त्यावेळी या हत्याकांडाचा निकाल 14 मे 2026 रोजी लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
या प्रलंबित असलेल्या निकालावर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर (Om Rajenimablkar) यांनी एका मुलाखतींमध्ये म्हटले आहे की, "एका लोकप्रतिनिधीच्या दिवसाढवळ्या झालेल्या हत्येचा निकाल लागायला जर 20-20 वर्षे लागत असतील, तर सामान्य माणसाने न्यायाची काय अपेक्षा ठेवायची?" अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती.
इतक्या प्रदीर्घ काळामुळे पुराव्यांची साखळी कमकुवत होते आणि आरोपींना त्याचा फायदा मिळतो. खटल्यादरम्यान अनेक साक्षीदार फितूर झाले, काही साक्षीदारांचा मृत्यू झाला. यावर भाष्य करताना ओमराजे म्हणाले होते की, "तारीख पे तारीख" च्या चक्रात मूळ गुन्हेगार नामानिराळे राहण्याची शक्यता असते. २० वर्षांचा काळ हा कोणत्याही पीडित कुटुंबासाठी अत्यंत क्लेशदायक असतो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती.
'निकालाला कितीही उशीर झाला तरी सत्याचा विजय होईल'
तपास यंत्रणांना सहकार्य न करणे किंवा तांत्रिक कारणांचा आधार घेऊन सुनावणी पुढे ढकलणे, यामुळे निकालाला विलंब झाल्याचे आरोप यावेळी केला. मी वयाच्या 22 व्या वर्षी अनाथ झालो, पण माझ्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी मी शेवटपर्यंत लढणार," असे ते नेहमी म्हणतात. निकालाला कितीही उशीर झाला तरी सत्याचा विजय होईल, असा विश्वास ओम राजेनिंबाळकर यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.