Hingoli Congress Politics : प्रज्ञा सातव यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश सर्वांनाच धक्कादायक आहे. काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या अचानक झालेल्या निधनानंतर पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर संधी दिली. राजीव सातव आणि राहुल गांधी यांच्यात घट्ट मैत्री होती. त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळल्यानंतर राहुल गांधी यांनी सांत्वनपर भेटीत गांधी कुटुंब आणि काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी आहे, असा विश्वास आणि शब्द सातव कुटुंबाला दिला होता. दिलेला शब्दही राहुल गांधी यांनी पाळला. पण प्रज्ञा सातव यांना मात्र मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं नाही.
शरद रणपिसे यांच्या जागेवर एक ते दीड वर्षाचा कार्यकाळ प्रज्ञा सातव यांना मिळाला. दरम्यान, हिंगोलीच्या तत्कालीन पालकमंत्री वर्षा गायकवाड आणि प्रज्ञा सातव यांच्यातही वाद झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे प्रज्ञा सातव (Pradanya satav) यांचा विधान परिषदेतील कार्यकाळ संपल्यानंतर दुसऱ्यांदा त्यांना उमेदवारी देण्यास वर्षा गायकवाड यांनी विरोध दर्शवला होता. त्यांच्याऐवजी दुसऱ्या कुणाला संधी द्या, अशी भूमिका त्यांनी राज्य पातळीवरील नेत्यांकडे मांडली होती. आपल्या नावाला विरोध होत असताना वरिष्ठ नेते त्याची दखल घेत नाही, याचा राग प्रज्ञा सातव यांच्या मनात होता.
हिंगोली जिल्ह्यातील पदाधिकारी नियुक्त्या आणि महत्वाचे निर्णय घेताना सातव यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना झुकते माप दिले जायचे. यातूनच पक्षात वादाची ठिणगी पडली होती. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही प्रज्ञा सातव या सक्रिय नव्हत्या. तसेच त्यांचा कार्यकर्त्यांशीही संपर्क तुटला होता. सातव यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन लोकसभेला महायुतीचे काम केल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महाविकास आघाडीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केला होता. काँग्रेस (Congress) नेत्यांकडे यासंदर्भात त्यांनी लेखी तक्रारही केली होती.
प्रज्ञा सातव या काँग्रेसच्या आमदार असूनही त्यांचा वरिष्ठ नेत्यांशी फारसा समन्वय नव्हता, त्याचा परिणाम पक्ष वाढीवरही झाला. पक्ष दखल घेत नाही, असे लक्षात आल्यानंतर त्यांनी अखेर काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आणि आज त्या भाजपमध्ये दाखल झाल्या. हिंगोली जिल्ह्यातील अनेक विकास प्रकल्प रखडले आहेत, ते पूर्ण होण्यासाठी सत्तेत राहणे आवश्यक आहे. दिवंगत राजीव सातव यांचे हिंगोली जिल्ह्याच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण भाजपमध्ये प्रवेश केल्याचा दावा प्रज्ञा सातव यांनी केला आहे.
मोदी लाटेत हिंगोलीत काँग्रेसचा झेंडा..
राजीव सातव राहुल गांधी यांच्या अत्यंत विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखले जात होते. 2014 च्या मोदी लाटेत महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे केवळ 2 खासदार निवडून आले होते. त्यामध्ये राजीव सातव यांचा समावेश होता. त्यामुळे राजीव सातव प्रचंड चर्चेत आले होते. त्यानंतर राजीव सातव यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्तुळात स्वत:चे स्थान निर्माण केले होते. राजीव सातव यांनी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सभापती, 2009 ते 2014 दरम्यान कळमनुरी विधानसभा सदस्य, 2014 हिंगोली लोकसभा सदस्य, 2020 मध्ये राज्यसभा सदस्य म्हणून काम केले. तर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस, गुजरातचे प्रभारी आणि काँग्रेस कार्य समितीचे सदस्य अशा विविध जबाबदाऱ्या आणि पदे त्यांनी भूषवली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.