Prakash Ambedkar-Manoj Jarange Patil Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil : जालन्यातून मनोज जरांगेंसाठी प्रकाश आंबेडकरांचा आग्रह का?

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेतील नाव. गेल्या सहा महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन उभे केले आहे. लाखो समाज बांधवांचा त्यांना पाठिंबा मिळत असून त्यांच्या सभा, पदयात्रा आणि आंदोलनाला न भूतो न भविष्यती असा प्रतिसाद मिळाला. सरकारलाही त्यांच्यापुढे झुकावे लागले.

मनोज जरांगे पाटील यांना जालना लोकसभा मतदारसंघातून (Jalna Loksabha Constituecy) निवडणुकीच्या आखाड्यात उतरविण्यासाठी वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी एकदा नव्हे तर तीन-चारवेळा मागणी केली आहे. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर महाविकास आघाडीतून जरांगे यांच्यासाठी जालना लोकसभा मतदारसंघ सोडावा, असा प्रस्तावही जागावाटप प्रक्रियेतील नेत्यांकडे दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्यभरात रान पेटवून लाखो समाज बांधवांची एकजूट करणाऱ्या जरांगे यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्याचा प्रयत्न वंचित आघाडी आणि महाविकास आघाडीचा दिसतो. जरांगे यांना जालन्यातून लोकसभेची उमेदवारी दिली, तर भाजपचे पाच टर्म खासदार आणि केंद्रात रेल्वे राज्यमंत्री असलेल्या रावसाहेब दानवे यांना दणका बसू शकतो.

अर्थात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आपण राजकारणात जाणार नाही, असे याआधीच स्पष्ट केले होते. परंतु तेव्हाची परिस्थिती आणि आता बदललेली राजकीय परिस्थिती, सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नाकारत स्वतंत्र 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. यातून सरकारने मनोज जरांगे पाटील यांची मागणीच फेटाळल्याचे दिसून आले आहे.

जरांगे पाटील यांचे आंदोलन दडपण्याचे प्रयत्न, अंतरवाली सराटीसह राज्यात जिथे जिथे हिंसक आंदोलने झाली, त्याची एसआयटी चौकशी आणि जरांगे यांच्यावर सत्ताधारी पक्षाच्या मंत्री, आमदारांकडून होणारी टीका यामुळे सत्ताधारी आता त्यांच्या विरोधात गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अशावेळी प्रकाश आंबेडकरांनी त्यांना जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा दिलेला सल्ला ते मनावर घेतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आंबेडकरांच्या या खेळीने एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपचे रावसाहेब दानवे हे गेल्या पाच टर्मपासून सलग निवडून आले आहेत. या आधी ते दोनवेळा आमदारही होते. केंद्रात दोनवेळा राज्यमंत्री राहिलेल्या दानवे यांची मतदारसंघावर मजबूत पकड आहे.

शिवाय ते मराठा असल्याने काट्याने काटा काढण्याच्या रणनितीचा भाग म्हणूनही आंबेडकरांच्या या मागणीकडे पाहिले जात आहे. आता मनोज जरांगे पाटील यांच्याकडून आंबेडकरांच्या प्रयत्नांना किती प्रतिसाद मिळतो, यावरच जालना लोकसभा मतदारसंघातील लढत अवलंबून असणार आहे.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT