Chhatrapati Sambhajinagar : एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आंबेडकरी जनतेचा अपमान केला आहे. वारंवार हरिजन असा जाणीवपूर्वक उल्लेख केल्याने समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. जातीयवादी इम्तियाज जलील यांना छत्रपती संभाजीनगरमधून हद्दपार करावे, अशी मागणी करत येत्या 23 जून रोजी शहरातून भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर अन्याय अत्याचार कृति समितीच्या वतीने या मोर्च्या परवानगीसाठी पोलिस आयुक्तांना निवदेन देण्यात आले आहे.
राज्याचे सामजिक न्याय तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्यावर बेकायदेशीररित्या मालमत्ता खरेदीचा आरोप करताना इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत हरिजन असा उल्लेख केला होता. शिरसाट यांनी आपल्या मुलांच्या नावे हरिजन समाजासाठी राखीव असलेली वर्ग दोनची सरकारी जमीन खरेदी केल्याचा आरोप इम्तियाज यांनी केला होता. तो करत असताना त्यांनी वारंवार 'हरिजन' असा उल्लेख करत आंबेडकरी जनतेचा आरोप केल्याचा कृती समितीचा आरोप आहे. यावरून इम्तियाज यांच्या विरोधात अॅट्राॅसिटीचा गुन्हाही दाखल झाला आहे.
इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांच्या विरोधातील रोष कायम असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर अन्याय अत्याचार कृति समितीच्या वतीने शहरातून मोर्चाचे नियोजन करण्यात येत आहे. हजारोंच्या संख्येने येत्या 23 तारखेला शहरातील क्रांतीचौक ते भडकल गेट दरम्यान निघणाऱ्या या मोर्चाला पोलीसांनी परवानगी द्यावी, या मागणीचे निवेदन पोलीस आयुक्त कार्यालयात समितीच्या वतीने देण्यात आले आहे.
आंबेडकरी जनतेच्या मतांवर खासदार झालेल्या इम्तियाज जलील यांनी आंबेडकरी जनतेकडे, सर्वसामान्य मुस्लिम जनतेकडे पाठ फिरवली. केवळ 'भर अब्दुल्ला गुड थैली मे' ही भुमिका घेऊन स्वतःचे घर भरले. इम्तियाज जलील यांनी आपल्या कृतीतून जातियवादाचे प्रदर्शन घडवले आहे. आंबेडकरी जनतेला जलिल यांनी हरिजन संबोधले. तसेच बाळासाहेब आंबेडकर यांच्यावरही खोटे आरोप केले आहेत. आंबेडकरी जनतेला आर्थिक सक्षम करून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सात कोटी कर्ज देण्याची शासकीय योजना सुरू करण्यात आली.
या योजनेचा अत्यंत बोटावर मोजता येतील इतक्या युवकांनी मदत घेतली, त्याचाही राग इम्तियाज जलील यांना आहे. त्यांना सात कोटींची गँग असा असंसदीय शब्द त्यांनी यांनी वापरला आहे. या पूर्वी ही त्यांनी अनुसूचित जातीच्या मतदारांना मारहाण करून त्यांची बदनामी केली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत झालेल्या सलग पराभवामुळे इम्तियाज जलील यांचा बौद्ध, अनुसूचित जातीच्या मतदारांवर राग आहे. याच जातियवादी भुमिकेतून छत्रपती संभाजीनगर औरंगाबादचे पालकमंत्री संजय सिरसाट यांना जाणिवपूर्वक टार्गेट करण्यात येत आहे.
तथाकथित विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याशी हातमिळवणी करून पालकमंत्री संजय सिरसाट यांच्या बदनामीची मोहीम इम्तियाज यांनी सुरू केली असल्याचा आरोप कृती समितीने केला आहे. अंबादास दानवे यांची जातियवादी भूमिका वेळोवेळी उघड झालेली आहे. निवडणुकीत धर्माच्या नावाखाली विष पसरवणारे हे दोघे आता एक कसे झाले? छत्रपती संभाजीनगरला प्रथमच वंचित समाजातील पालकमंत्री लाभल्याने इम्तियाज आणि दानवे या दोघांची जातियवादी जळजळ आता बाहेर आली आहे. आंबेडकरी, वंचित समुहाला हरिजन, गँग संबोधून त्यांनी आंबेडकरी जनतेचा स्वाभिमान दुखावला आहे.
इम्तियाज जलील हे पोलिसांवर दबाव निर्माण करत असून 'पोलिसांना श्रद्धांजली' अशा पद्धतीचा विघातक कार्यक्रम राबवत आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी 'जातियवादी इम्तियाज जलिल को जवाब दो' स्वाभिमान मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चात सर्व बहुजनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आंबेडकर वादी कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे. मोर्चाच्या परवानगी साठी पोलीसांना आज समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.