Tanaji Sawant Sarkarnama
मराठवाडा

Shivsena UBT News : ओमराजेंमुळेच सावंतांसाठी मातोश्रीचे दरवाजे उघडले गेले...

Shital Waghmare

Dharashiv News : खासदार ओमराजे यांना उमेदवारी मिळावी म्हणून आपण उद्धव ठाकरे यांना तेव्हा पक्षनिधी म्हणू दहा कोटींचा धनादेश दिला होता, असा दावा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी एका कार्यक्रमात केला होता. शिवाय ओमराजे यांना निवडून आणण्यासाठी आपल्या खिशातले एक कोटी खर्च केल्याचे सांगत सावंत यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले होते. यावर आज शिवसेना ठाकरे गटाकडून सावंत यांना प्रत्युत्तर देण्यात आले.

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यामुळेच तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांना मातोश्रीचे दरवाजे खुले झाले. यापुढे आरोप कराल तर जशासतसे उत्तर देऊ, असा इशारा जिल्हा संपर्कप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी दिला. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी म्हणून पक्षाला 10 कोटी रुपयांचा निधी दिल्याचे सांगता. पक्षासाठी तुमच्यासारखे अनेकजण निधी देतात, मात्र मातोश्रीचे दरवाजे तुमच्यासाठी खासदार ओमराजे यांनीच पहिल्यांदा उघडले याची जाणीव ठेवा, असा पलटवारही मकरंद राजेनिंबाळकर यांनी केला.

तुम्हाला मंत्रिपद दिले ते लोकांचे वडील काढण्यासाठी नसून लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आहे. विशेष म्हणजे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या शस्त्रक्रियेसाठी आपण आरोग्यमंत्री म्हणून त्या फाईलवर सही केली, तो कर्तव्याचा भाग होता. त्यामुळे आपण त्यांच्यावर उपकार केले नाही, असे म्हणत मकरंदराजे यांनी पाटील यांच्यावर केलेल्या टीकेचाही समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांचा धाराशिव दौरा आणि त्याला मिळालेला प्रतिसाद मोठा होता. शिवाय उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या भाषणातून थेट मंत्री तानाजी सांवत यांनाच लक्ष्य केले.

ठाकरे धाराशिवमधून गेल्यानंतर जिल्ह्यात त्यांच्या भाषणाचे पडसाद उमटायला सुरवात झाली होती. काल तानाजी सावंत यांनी उद्धव ठाकरे यांच्या प्रत्येक टीकेला उत्तर देतांना पातळी सोडली. सावंत यांनी केलेले आरोप, दावे यावर आज ठाकरे गटाकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले. मकरंद राजेनिंबाळकर यांनी पत्रकार परिषद घेत सावंत यांच्या आरोपांची चिरफाड केली. मंत्री सावंत यांनी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर (Omraje Nimbalkar) व माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्यावर टीका केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आजपर्यंत अशा पद्धतीची टीका जिल्ह्यात झालेली नाही, त्यांच्या टीकेचा आणि भाषेचा आम्ही निषेध करतो. धाराशिव जिल्हा भाई उद्धवराव पाटील यांच्या लौकिकामुळे ओळखला जातो. परंतू आता हा जिल्हा बदनाम झाला असल्यामुळे सर्व पक्षाच्या नेत्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणाऱ्या लोकप्रतिनिधींना हद्दपार केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. तर 2022 नंतरच्या सत्तांतरा नंतर सावंत यांनी पालकमंत्री झाल्यापासून अतिशय खालच्या पातळीचे वागणे व बोलणे सुरू केले आहे.

सर्वसामान्य नागरिकांनाहीअशाच भाषेत बोलणारा माणूस लोकांना नकोसा झाला आहे. त्यांना पालकमंत्रिपद कशासाठी मिळाले ? मंत्री म्हणून जी शपथ घेतली त्याचा त्यांना बहुदा विसर पडलेला दिसतो, असा टोलाही मकरंद राजेनिंबाळकर यांनी यावेळी लगावला. खासदार ओमराजे यांचे वडील दिवंगत पवन राजेनिंबाळकर हे संपूर्ण जिल्ह्याला माहित आहेत. त्यांच्या नखाचीही बरोबरी कोणी करू शत नाही. त्यांनी नि:स्वार्थपणे सगळ्यांना मदत केली, मात्र आपण ज्या पद्धतीने राजकारण करत आहात, ते यापुढे खपवून घेतले जाणार, नाही इशाराही मकरंद राजेनिंबाळकर यांनी यावेळी सावंत यांना दिला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT