Shivsena-Congress On Water Issue News Sarkarnama
मराठवाडा

Water Politics News : 'लबाड' राजकारणी अन् 'भाबडी'जनता! संभाजीनगरमध्ये पाण्याचा खेळ

Politicians continue to play games over the ongoing water crisis in Sambhajinagar, misleading and deceiving citizens. : महापालिका निवडणुका पाहता विरोधी पक्षनेते असताना देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनावरून रान उठवण्याचे आणि पुन्हा त्याच पाणी प्रश्नावरून महापालिकेची सत्ता मिळवण्याचा प्रयत्न उद्धवसेनेकडून सुरू आहे.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar :शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांचा काल शहराच्या पाणी प्रश्नावर हल्लाबोल मोर्चा झाला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणि आदित्य ठाकरे यांचे पिताश्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी पाणी प्रश्नाचे राजकारण केले. संभाजीनगर महापालिकेवर जन आक्रोश मोर्चा काढत पाण्यासाठी त्राहीमाम करण्याची वेळ आणि पाप शिवसेनेचे असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

तसेच राज्यात आपली सत्ता आली तर सहा महिन्यात पाणी देऊ, असे आश्वासन देत शिवसेनेसोबत पंचवीस वर्ष महापालिकेत सत्ता भोगलेल्या भाजपने संभाजीनगरच्या पाणी प्रश्नाला (Water Issues ) एकटी शिवसेनाच कशी जबाबदार? आहे हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न केला होता. आता राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार आहे आणि पक्षफुटी नंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विरोधकांच्या भूमिकेत. महापालिका निवडणुका पाहता विरोधी पक्षनेते असताना देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनावरून रान उठवण्याचे आणि पुन्हा त्याच पाणी प्रश्नावरून महापालिकेची सत्ता मिळवण्याचा प्रयत्न उद्धवसेनेकडून सुरू आहे.

काल संभाजीनगरात (Chhatrapati Sambhajinagar) हल्ला मोर्चा काढत गेल्या महिन्याभरापासून शहरात 'लबाडांनो पाणी द्या' या घोषवाक्यखाली उद्धवसेनेने वातावरण निर्मिती केली. परंतु पंचवीस वर्षे तुम्हीही सत्तेत होतात मग मोर्चा कसे काढता? असा सवालही नागरिकांकडून त्यांना विचारला गेला. यावर शिवसेनेच्या सत्ता काळात शहराला तीन- चार दिवसाआड पाणी मिळत होते, आता राज्यात महायुतीची सत्ता आणि सरकार असूनही दहा-बारा दिवसांनी नळाला पाणी येते याला जबाबदार कोण? असे म्हणत 'लबाडांनो पाणी द्या' आंदोलनाचे समर्थन केले.

आदित्य ठाकरे यांच्या मोर्चाच्या पूर्व संध्येला भाजपच्या मंत्री आणि आमदार, खासदारांनी पत्रकार परिषद घेऊन पाणी योजना रखडण्याला उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष कसा जबाबदार आहे? हे सांगण्याचा प्रयत्न केला. समोरासमोर या, कपडे फाडू अशी भाषा दोन्ही बाजूंनी झाली. अखेर काल आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात शहरात हल्लाबोल मोर्चा निघाला आणि सहा महिन्यात पाणी देऊ सांगणाऱ्यांनी आतापर्यंत पाणी का दिले नाही? पाणी कधी देणार? हे सांगा असे म्हणत भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला.

तसं पाहिले तर संभाजीनगरचा पाणी प्रश्न हा आजचा नाही, तर गेल्या अडीच- तीन दशकांपासूनचा आहे. विशेष म्हणजे या काळात महापालिकेवर शिवसेना- भाजप या दोन पक्षांचीच सत्ता कायम राहिली होती. विरोधी पक्षांना इथे फारसा वाव नसल्यामुळे त्यांनीही सत्ताधाऱ्यांशी जुळवून घेत आपलेच उखळ पांढरे करून घेतले. प्रशासनातील अधिकार्‍यांनी लोकप्रतिनिधी आणि महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना 'मुजरे' घालत 'जी हुजूर' म्हणत संभाजीनगरकरांच्या पाणी प्रश्नाच्या पापात आपलाही सहभाग दाखवला.

संभाजीनगरच्या जनतेच्या संयमाचेही करावे तेवढे कौतुक कमीच आहे. कधी जातीयवादाच्या मुद्द्यावरून हिंदू मुस्लिम, खान-बाण तर कधी पाणी प्रश्न सोडवतो असे वर्षानुवर्ष सांगणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडत त्यांनाच सत्ता सोपवण्याच्या चुका नागरिकांकडूनही झाल्या. पंचवीस वर्षाची सत्ता हा कमी कालावधी नाही. त्यामुळे आज सत्ताधारी आणि विरोधक पाणी प्रश्नावरून कितीही स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करत असले तरीही त्यांना तो नैतिक अधिकार राहिलेला नाही.

महापालिका निवडणुका आल्यानंतरच राजकीय पक्षांना नेमका पाणी प्रश्न कसा आठवतो? 'लबाडांनो पाणी द्या' हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जन आंदोलन योग्य असले तरी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अनेक वर्ष लबाडी करत संभाजीनगरच्या भाबड्या जनतेची फसवणूक आणि दिशाभूलच केली आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून काम सुरू असलेल्या 1680 वरून 2740 कोटींवर पोहोचल्या पाणी योजनेचे पाणी कधी येणार? हे ही या सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना सांगता येत नाही.

यावरून इतकी वर्ष महापालिकेची सत्ता भोगलेल्या राज्यकर्त्यांनी पाण्याच्या प्रश्नावरून संभाजीनगरातील जनतेचा अक्षरशा खेळ चालवला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. राजकारण्यांच्या धूर्तपणामुळे जनतेच्या जीवन मरणाचा प्रश्न असलेल्या पाण्याचेही राजकारण या मंडळींकडून अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे सगळेच राजकारणी लबाड आणि संभाजीनगरची जनता भाबडी ठरली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT