
Chhatrapati Sambhajinagar : महापालिकेच्या सत्तेत 27 वर्षे गळ्यात गळे घालून सत्तेचा मलिदा लाटून शहरवासीयांना पाणी पाणी करण्यास भाग पाडणारे दोन पक्ष पाण्याचे अपयश झाकण्यासाठी आता एकमेकांच्या विरोधात गरळ ओकत आहेत. पाणी टंचाईला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षच जबाबदार असून, चंद्रकांत खैरे पाणी योजनेचे मारेकरी आहेत. पाण्याच्या विषयावर आमच्यासोबत डिबेट करा, तुमचे कपडे फाडू असे आव्हान भाजप नेत्यांनी दिले.
त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने क्रांती चौकात समोरासमोर या, असे प्रत्युत्तर दिल्याने आदित्य ठाकरे यांच्या मोर्चाच्या पुर्वसंध्येला उद्धवसेना आणि भाजपामध्ये टेन्शन वाढल्याचे दिसून आले. नव्या पाणी योजनेचे दोन वर्षे पाणी मिळणारच नाही, सध्या शहराला मिळणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी आमचे आंदोलन सुरू असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी म्हटले आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या पाणी प्रश्नावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजपा आमने सामने आले आहेत. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्या (ता.16) रोजी हल्लाबोल मोर्चा काढण्यात येत आहे. त्याआधीच भाजपाचे मंत्री अतुल सावे, (Atul Save) खासदार भागवत कराड, आमदार संजय केणेकर आदींनी पत्रकार परिषद घेतली. शहराच्या पाणी टंचाईला ठाकरे गटच जबाबदार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. एवढेच नाही तर पाण्याच्या विषयावरून कपडे फाडण्यापर्यंत भाजप नेते घसरले.
सहा महिन्यात शहराला पाणी देऊ
बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांनी सहा महिन्यात शहराला मुबलक पाणी देऊ असे सांगितले. भाजपच्या कार्यकाळात शहरात अनेक उद्योग येत आहेत. त्यात पाण्याचे आंदोलन उभारून यूबीटी पक्ष वातावरण खराब करण्याचे काम करत आहे. शहराच्या पाणी टंचाईला हाच पक्ष जबाबदार असून, त्यांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. संपूर्ण पाणी योजनेचा मी आढावा घेतला आहे. त्यानुसार नाथसागरातील जॅकवेलच्या पहिल्या टप्प्याचे काम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करून शहराला वाढीव 200 एमएलडी पाणी आणले जाईल, आसा नवा दावा सावे यांनी केला.
ठाकरे गटाचे आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा
खासदार डॉ. भागवत कराड यांनी पुन्हा एकदा खैरे यांना टार्गेट केले. महापालिकेत युतीची सत्ता होती, पण खैरे यांच्या आदेशाशिवाय एकही ठराव घेणे शक्य नव्हते. कुठलीही दूरदृष्टी नसलेला नेता शहराला भेटल्याने नुकसान झाले. नव्या योजनेची निविदा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे रखडून ठेवली. त्यामुळेच पाणी योजनेचे काम लांबणीवर पडले. ठाकरे गटाचे आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, खैरे-दानवे मधील वादामुळे हे आंदोलन सुरू आहे, असा आरोप कराड यांनी केला.
तर आमदार संजय केनेकर यांनीही कराड यांची री ओढली. शहराचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यामुळे बट्ट्याबोळ झाला, असा आरोप त्यांनी केला. अडीच वर्षे पाणी योजनेची निविदा रखडवून ठेवण्याचे पाप उद्धव ठाकरे यांनी केले. त्यामुळे शहराला सुमारे 300 कोटी रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेले हे पाप लपविण्याचा प्रयत्न अंबादास दानवे करत आहेत. त्यांनी आमच्यासोबत डिबेट करावे, त्यांचे कपडे फाडू, असे आव्हान केनेकर यांनी दिले.
सावे जलसम्राट कसे!
विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपच्या आरोपांना प्रत्यूत्तर दिले. आम्ही लबाडांच्या विरोधात आंदोलन करत आहोत, त्यांना अंगावर घेण्याची गरज नव्हती. लबाड आपणच आहोत, हे कळल्यामुळे भाजपने पत्रकार परिषद घेतल्याचा आरोप दानवे यांनी केला. समांतर पाणी पुरवठा योजनेला कोणी विरोध केला, ठराव कोणी मांडला, विरोधात आंदोलने कोणी केली, याचे पुरावे आमच्याकडे आहेत, असे दानवे म्हणाले.
आम्ही नव्या पाणी योजनेच्या विरोधात नाही, तर सध्या शहराला मिळणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करून शहराला एक दिवसाआड पाणी, अशी मागणी केली आहे. त्यानुसार प्रशासन सुधारणा करत आहे, हे आमच्या आंदोलनाचे यश आहे, आमच्या आंदोलनानंतर सावेंना टँकर सुरू करावे लागले, सावे जलसम्राट कसे, असा प्रश्न दानवे यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.