Santosh Deshmukh Murder Case Krishna Andhale: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एक फरार असलेल्या कृष्णा आंधळेबाबत संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी खळबळजनक माहिती समोर आणली आहे. कृष्णा आंधळे एकदा-दोनदा नव्हे तर तीन वेळा आपल्या गावी येऊन गेला. कुटुंबाला भेटून गेला, याची सीआयडीलाही माहिती आहे. मग तो पोलिसांना सापडत कसा नाही? असा सवाल धनंजय देशमुख यांनी केला आहे. सगळे आरोपी एकमेकांच्या संपर्कात आहेत. कृष्णा आंधळे हा मोबाईल वापरत नसल्यामुळं त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. पण त्याचा लवकरात लवकर छडा लावून अटक होणं गरजेचं आहे. या आरोपींकडून आमच्या कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याची भीती पुन्हा एकदा धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
सीआयडी, पोलीस व तपास यंत्रणांनी कृष्णा आंधळेला तातडीने अटक करून त्याची धिंड काढावी, अशी मागणीही देशमुख यांनी केली. केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा गेल्या सहा महिन्यांत चक्क तीनवेळा गावात येऊन गेल्याचा खळबळजनक दावा धनंजय देशमुख यांनी केला. विशेष म्हणजे, तपास यंत्रणेने (सीआयडी) देखील ही बाब मान्य केल्याचे देशमुख यांनी सांगितलं आहे. या प्रकारामुळे देशमुख कुटुंबाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, या प्रकरणाची शनिवारी बीड सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी पुराव्यांची कमतरता आणि तांत्रिक बाबींवरून न्यायालयीन कामकाजात मोठी खडाजंगी पाहायला मिळाली.
शनिवारी झालेल्या सुनावणीत खटल्यातील आरोपी क्रमांक 3 ते 7 यांनी विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांना या प्रकरणातून हटवण्यात यावे, असा अर्ज न्यायालयात सादर केला आहे. या अर्जावर आता सरकारी पक्षाला आपले लेखी म्हणणे मांडण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच आरोपी जयराम चाटे याने आपले वकील बदलले असून, आता अॅड. एम. के. वाघीरकर त्यांची बाजू मांडणार आहेत.
खटल्याला होणारा विलंब लक्षात घेता, न्यायालयाने सरकारी पक्षाला कडक तंबी दिली आहे. तपासाशी संबंधित सर्व आवश्यक कागदपत्रे आणि पुराव्यांची पूर्तता तातडीने आरोपी पक्षाला करण्यात यावी, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत. पुराव्यांच्या कमतरतेमुळे खटला लांबणीवर पडत असल्याचे निरीक्षणही यावेळी नोंदवण्यात आले. मृताचे भाऊ धनंजय देशमुख यांनी पोलिसांच्या आणि सीआयडीच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले. आरोपी गावात येतो, फिरतो आणि पोलीस त्याला पकडू शकत नाहीत, हे अनाकलनीय आहे. आमच्या संपूर्ण कुटुंबाच्या जिवाला धोका असून कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 6 मार्च रोजी होणार आहे. फरार कृष्णा आंधळे पोलिसांच्या हाती कधी लागणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
या खळबळजनक हत्याकांडात पोलिसांनी आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे. यात हत्या व खंडणी गुन्ह्यात विष्णू चाटे, सुदर्शन घुले तर खंडणी व अन्य गुन्ह्यात वाल्मीक कराड, जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले आणि सुधीर सांगळे आदींना अटक करण्यात आले आहे. या प्रकरणातील कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक नेमले आहे. पण अद्याप त्याचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.