Santosh Deshmukh Murder Case : सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रुरपणे झालेल्या हत्येने संपूर्ण राज्य हादरले. गेल्या साडेतीन महिन्यापासून महाराष्ट्रात हा विषय प्रत्येकाच्या तोंडी आहे. दोषारोपपत्र दाखल होऊन देशमुखांची हत्या कशी केली गेली? याचे अंगावर शहारे आणणारे फोटो बाहेर आले आणि महाराष्ट्र संतापला. या संपूर्ण हत्या प्रकरणात आरोपींना फासावर लटकवण्यापर्यंतचा लढा देणारे भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी 'सरकारनामा'च्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींचा उलगडा केला.
सरपंच संतोष देशमुख याचा मर्डर झाल्यानंतर मी जिल्हा शल्यचिकित्सकांना फोन लावून त्याला कसे मारले? या संदर्भात माहिती विचारली. (Beed News) एखाद्या व्यक्तीला एक ठोसा लगावला तर शरीरात 15 मिली रक्त साकोळते, मग संतोष देशमुखच्या शरीरात किती साकोळले हे विचारले. तेव्हा त्यांनी सांगितले दोन लिटर अन् हे ऐकूण माझे डोके हलले. तुम्हाला त्याला मारायचाच होता तर टायरखाली घालयचा होता, नाहीतर थेट गोळी घालायची असती असं मी बोललो होतो.
पण ज्या क्रूरपणे त्याच्या छातीवर ठोसे मारून बरगड्या तोडल्या, रक्ताची उलटी होईपर्यंत अडीच तीन तास त्याला मारहाण झाली हे समोर आले अन् माझे डोके हलले. त्यानंतर मी या खूना मागचा आका शोधून काढला, असे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी सांगितले. 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांचा मर्डर झाला. दरम्यान, मी इकडे परत आल्यानंतर सगळी माहिती घेतली, फोनाफोनी केली अन् 16 डिसेंबर रोजी मी विधिमंडळाच्या सभागृहात हा विषय मांडला. त्यानंतर खऱ्या अर्थाने हे प्रकरण राज्याच्या जनतेसमोर आले. या खून प्रकरणातील घटनाक्रम जसजसा समोर आला, तसा यामागे कोण आहे? त्यांचा आका कोण? हे मी शोधले होते.
मुख्यमंत्री माझ्या पाठीशी..
सरपंच संतोष देशमुख यांचा खून झाल्यानंतर यातील आरोपी हे मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे आहेत याची माहिती मी वरिष्ठ पातळीवर आमच्या नेत्यांना दिली होती. धनंजय मुंडे यांच्या लोकांनी हे उद्योग करून ठेवले आहे, त्यांना पालकमंत्री केले तर अडचणीचे ठरेल, असे मी सांगितले होते. त्यांच्याऐवजी प्रकाशदादा सोळंके यांना मंत्री करा, असे मी म्हणालो होतो. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याचा म्हणजेच धनंजय मुंडे यांच्या जवळचे लोक आरोपी आहेत हे सांगितल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्या पाठीशी उभे होते. माझ्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव नव्हता, असेही धस यांनी स्पष्ट केले.
सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांवर 302चा गुन्हा दाखल करा, मकोका अंतर्गत कारवाई करा, अॅट्रासिटी, एसआयटी, सीआयडी चौकशी अशा ज्या मागण्या मी केल्या त्या सगळ्या मान्य झाल्या. माझे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मला कधीच रोखले नाही. त्यामुळे या प्रकरणात आपल्यावर कोणाचाही दबाव नव्हता, याचा पुनरुच्चार धस यांनी केला.
महादेव मुंडे प्रकरण मीच शोधले..
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मी एक दिवस रात्रभर आॅनलाई एफआरआयच्या नोंदी पाहत होतो. त्यात मला परळीतील सोळा महिन्यापूर्वीचे महादेव मुंडे यांच्या हत्येचे प्रकरण सापडले. 38 वर्षाच्या या तरुणाचा खून गळा चिरून अमानूषपणेच करण्यात आला. आकाच्या घरासमोरच्या मैदानावर हा सगळा प्रकार घडला आणि नंतर त्यांची बाॅडी तहसिल कार्यालयासमोर फेकून देण्यात आली.
या खून प्रकरणाच्या दोन दिवस आधी परळीत वैद्यनाथ मंदिरातील पुजाऱ्याला आकाच्या टोळक्यांनी मारहाण करून त्याचे हात-पाय तोडले होते. तर सातभाई नावाच्या एका तरुणाला अशाच पद्धतीने मारहाण केली होती. या दोन घटनेमध्ये ज्यांचा सहभाग होता, त्यांनीच महादेव मुंडे यांचीही हत्या केली, असा दावा सुरेश धस यांनी केली. पण अजूनही या खूनाचे आरोपी सापडत नाहीयेत. मी स्वतः महादेव मुंडे यांच्या पत्नीची भेट घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचा शब्द दिला आहे, लवकरच या खून प्रकरणातील आरोपीही सापडतील, असे धस यांनी यावेळी सांगितले.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.