Sharad Pawar Sarkarnama
मराठवाडा

Sharad Pawar Live : शरद पवारांनी भाजपविरोधात थोपटले दंड; फाळणीपासून मणिपूरपर्यंत सगळंच काढलं

सरकारनामा ब्यूरो

Chhatrapati Sambhajinagar : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेल्या बैठकीनंतर राज्यभरात उलट-सुटल चर्चा झाल्या. त्यावर याआधी पवारांनी स्पष्टीकरण देऊनही, महाविकास आघाडीतील नेत्यांनी वेगळी चूल मांडण्यांची तयारी केली. अशातच आता पवारांनी पुण्यात बैठक झाल्याचे मान्य केले आणि त्याचवेळी भाजपविरोधात आरोपांची माळ लावली. फाळणीचा मुद्दा उकरून काढत आताच्या मणिपूर हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आठच मिनिट बोलल्याचे सांगून पवारांनी भाजपसोबत जाणार नसल्याचेच स्पष्ट केले. (Latest Political News)

छत्रपती संभाजीनगर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बुधवारी शरद पवारांनी भाजपविरोधात रणशिंग फुंकले आहे. यावेळी त्यांनी आपण इंडियात असून भाजपविरोधात जोमाने लढणार असल्याचे सांगून महाविकास आघाडीत निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पवारांनी फळणीबाबत भाजपचे सर्क्युलर वाचून दाखवत देशात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पक्षाला आपला कायम विरोध असणार असल्याचे स्पष्ट केले. तर भाजपला मणिपूर पेटवायचेच होते. यामुळे देश, राज्यातील २०२४ ला चित्र बदलण्यासाठी कष्ट करणार असल्याचे सांगून पवारांनी भाजपविरोधात दंड थोपटले आहेत.

शरद पवार म्हणाले, "भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर देशाचे दोन भाग झाले. फाळणीवेळी देशात दोन धर्मांत मोठा हिंसाचार झाला. एकमेकांवर अत्याचार, अन्याय झाले. परिणामी देशातील दोन धर्मांत कटुता निर्माण झाली होती. उत्तरेकडे ही कटुता पुढे अनेक वर्षे टिकून राहिली. ती कटुता विसरून देश आता पुढे जात असतानाच भाजपने फाळणीबाबत एक सर्क्युलर काढले. त्यात फाळणीचा स्मरण दिवस साजरा करण्याचे आवाहन भाजपने केले आहे. यामुळे देशात पुन्हा हिंसाचार होण्याची शक्यता असून भाजपला ही तेच हवे आहे."

राज्याराज्यात हिंसाचार घडवण्यात भाजपचा माहेर असल्याचे सांगून मणिपूर पेटण्यासही तेच जबाबदार असल्याचा दावा पवारांनी यावेळी केला. "मणिपूरमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे. तेथील महिलांवर अत्याचार झाले तरी केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपने कुठलीही ठोस भूमिका घेतली आहे. वारंवार मागणी करूनही पंतप्रधान मोदींनी संसदेत निवेदन दिले नाही. अविश्वास ठराव आणला त्यावेळ मोदी मणिपूरवर फक्त आठ मिनिटे बोलले. यातून त्यांना मणिपूरला पेटते ठेवण्यातच रस होता की काय, असा संशय बळावतो", असा घणाघात पवारांनी केला. यानंतर देशातील आणि राज्यात सत्ता बदल करण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार असून पवारांनी आपली भाजपविरोधात भूमिका कायम असल्याचे स्पष्ट केले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT