Shivsena UBT Tractor March In Chhatrapati Sambhajinagar News Sarkarnama
मराठवाडा

Shivsena UBT News : 'क्या हुआ तेरा वादा' शिवसेनेचा ट्रॅक्टर मोर्चा, स्टेअरिंग दानवेंच्या हाती!

Shiv Sena organized a tractor rally in Sambhajinagar highlighting farmers’ issues. Ambadas Danve led the march with steering in hand : विधानसभा निवडणूकीच्या प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये देण्याचा वादा केला होता. त्याचा जाब आम्ही विचारत आहोत.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मराठवाड्यात 'क्या हुआ तेरा वादा' म्हणत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जनआंदोलन सुरू केले. पाच जून पासून सुरू असलेल्या या आंदोलनात आज छत्रपती संभाजीनगरमध्ये ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. शहरातील क्रांतीचौकापासून शेकडो ट्रॅक्टर विभागी आयुक्त कार्यालयावर धडकले. विशेष म्हणजे या ट्रॅक्टर मोर्चात शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवले. तर त्यांच्या शेजारी चंद्रकांत खैरे बसले होते. त्यामुळे शिवसेनेचे स्टेअरिंग आता दानवेंच्या हाती आले आहे, अशी चर्चा सुरू होती.

विधानसभा निवडणुकी दरम्यान महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनांचा काय झाले, हे विचारत क्या हुआ तेरा वादा? असा सवाल शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने (Shivsena UBT) सरकारला विचारला. कांद्याला, कपाशीला सोयाबीनला भाव मिळालाच पाहिजे, कर्जमुक्ती झालीच पाहिजे, पीक कर्ज मिळाले पाहिजे, अशा घोषणांनी शहर दणाणून गेले होते. ट्रॅक्टर मोर्चानंतर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना अडीच लाखापर्यंत कर्जमाफी देण्यात आली होती. विधानसभा निवडणूकीच्या प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये देण्याचा वादा केला होता. त्याचा जाब आम्ही विचारत आहोत.

सरकारने जनतेची फसवणूक केली

2100 तर सोडा 1500 रुपये महिलांना वेळेवर मिळत नाही. क्या हुआ तेरा वादा? या आंदोलनाची लाट आता संपूर्ण महाराष्ट्रात उसळेल, असा इशारा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी यावेळी दिला. कर्जमाफी, शेतकरी सन्मान योजना, लाडक्या बहिणींना 2100 रुपये, 45 हजार पाणंद रस्ते, अन्नदाता ऊर्जादाता, शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव, खतावरील जीएसटी अनुदानात परत आणि एक रुपयात पीकविमा अशा ढीगभर वचनांचा ढोल बडवून सत्तेत आलेलं हे सरकार आता सगळं विसरलंय. सत्तेच्या खुर्चीवर बसताच या सरकारने जनतेची फसवणूक केली. म्हणूनच एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच्या या तिहेरी सरकारला आम्ही विचारतो, ‘क्या हुआ तेरा वादा?’ असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते (Ambadas Danve) अंबादास दानवे यांनी सरकारला केला.

मराठवाडा विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे व शिवसेना नेते तथा राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राज्य शासनाकडे केलेल्या मागणीची निवेदन देण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने विभागीय आयुक्त यांच्या मार्फत हे निवेदन देण्यात आले. महायुती सरकारने मोठा गाजावाजा करत जाहीर केलेल्या अनेक योजना आणि दिलेली आश्वासने आज केवळ कागदावरच राहिली आहेत. यामुळे शेतकरी प्रचंड निराशेच्या गर्तेत ढकलला गेला असून, अनेक मूलभूत समस्यांनी डोके वर काढले आहे.

अजित पवार शेतकऱ्यांची थट्टा करतात..

याचाच परिणाम म्हणून, गेल्या सात महिन्यांत राज्यात 1000 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. शेतकऱ्यांच्या मार्फत राज्याच्या तिजोरीत जाणारा जीएसटी अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना परत करण्याच्या बाता मारल्या, मात्र जीएसटी अद्याप शेतकऱ्यांच्या वाट्याला आलाच नाही. कर्जमाफी तसेच वेळेत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा पत्ता नाही. सरकारने सरड्याला लाजवेल इतका वेगाने रंग बदलला. कर्जमाफीच्या अपेक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक वर्ष संपत आले असताना कर्ज भरण्यासाठी सांगून अर्थमंत्री अजित पवारांनी त्यांची क्रूर थट्टा केली. सोयाबीन आणि कापसाचे भाव पाडण्यासाठी परदेशातून हे पीक आयात करण्याचे फतवे काढले जात आहेत.

शेतकरी सन्मान योजनेची रक्कम 12 हजारांवरून 15 हजार रुपये करण्याचे आश्वासन केवळ 'बाजार गप्पा' ठरले आहे. शेतमाल खराब न होण्यासाठी शीतगृहे देण्याचे बोलले, पण आज पावसाने खराब झालेल्या पिकाचे नुकसानही सरकारला उघड्या डोळ्याने दिसेनासे झाले आहे. हमीभावाची 'दीडपट' भूलथाप ही शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखी आहे. उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभावाची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यासारखे आहे. सरकार फक्त कागदावर आकडेवारीचा खेळ करते आणि प्रत्यक्षात अन्नदात्याला वाऱ्यावर सोडून, त्याच्या जखमेवर मीठ चोळत आहे, असे शिवसेनेने विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT