Mahavikas Aghadi Meeting : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी रविवारी घडवलेल्या एका राजकीय हालचालीमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना तोंड फुटले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर बोलावलेल्या महत्त्वाच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्यानंतर त्यांनी परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीलाही दांडी मारली. त्यामुळे संजय जाधव यांचं राजकीय भविष्य वेगळ्या दिशेने सरकत असल्याच्या चर्चांना पुन्हा वेग आला आहे.
राज्यात सध्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेकडून सुरू असल्याचे बोलले जाणारे ‘ऑपरेशन टायगर’ पुन्हा चर्चेत आले आहे. शिवसेना ठाकरे सेना पक्षातील तब्बल सात खासदार संपर्कात असल्याच्या चर्चांनी आधीच राजकीय वातावरण तापले असताना, या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत काही खासदार गैरहजर असल्याची माहिती समोर आली होती.
यामध्ये शिवसेना ठाकरे सेनेचे खासदार संजय जाधव (Shivsena) यांचे नाव चर्चेत आले. सुरवातीला ते बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र मतदारसंघात सुरू असलेल्या ‘धोंडे जेवण’ कार्यक्रमांमुळे मुंबईत पोहोचणे शक्य नसल्याचा निरोप त्यांनी ‘मातोश्री’वर पाठवला होता.
मात्र त्यानंतर घडलेल्या दुसऱ्या राजकीय घडामोडीने चर्चांना अधिक खतपाणी घातले. परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिवसेना ठाकरे सेनेचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित होते. काँग्रेसचे खासदार कल्याण काळे तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आणि शिवसेना ठाकरे सेनेतील स्थानिक पदाधिकारीही बैठकीला उपस्थित होते. मात्र संजय जाधव पुन्हा गैरहजर राहिले.
या बैठकीदरम्यान अंबादास दानवे यांनी कोणाचेही नाव न घेता केलेले वक्तव्य अधिकच चर्चेचा विषय ठरले. कोणी तुम्हाला बोलवेल, कोणी सूचना देईल. पण त्यांच्याकडे जाऊ नका, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. या निवडणुकीचे प्रमुख आमदार डॉ. राहुल पाटील आहेत, असे सूचक विधान त्यांनी केले.
अंबादास दानवे यांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गटात सर्व काही सुरळीत नसल्याची चर्चा अधिक तीव्र झाली आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून सुरू असल्याच्या ‘ऑपरेशन टायगर’ चर्चांना पुन्हा हवा मिळाली आहे.
आता आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात हे ‘ऑपरेशन टायगर’ नेमके कोणत्या पक्षाला हादरा देणार? ठाकरे गट या दबावाला कशाप्रकारे उत्तर देणार? आणि महायुतीतील भाजप यामध्ये कोणती रणनीती घेणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.