Shivsena News Sarkarnama
मराठवाडा

Shivsena News : 'त्या' दुर्घटनेत शिरसाट-दानवेंचे जुळले सूर; दोघांनीही केली एकच मागणी

Jagdish Pansare

Marathwada News : राज्यात शिवसेनेत फूट पडल्यापासून शिंदे आणि ठाकरे गट एकमेकांवर तुटून पडत आहेत. वर्षभरात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, टीका करत दोन्ही बाजूंनी कुरघोडीचे प्रकारही घडले. (Shivsena News) क्वचित प्रसंगी एकाच व्यासपीठावर येण्याची वेळ आली तर तिथेही त्यांच्यातील बेबनाव जाणवला. आमदार संजय शिरसाट, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यातील कलगितुऱ्यानेही चांगलेच मनोरंजन केले आहे.

संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वाळुज औद्योगिक वसाहतीत नुकताच एक भीषण दुर्घटना घडली. एका कंपनीत लागलेल्या आगीत होरपळून सहा कामगारांचा मृत्यू झाला. (Shivsena) या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर योगायोगाने संजय शिरसाट, दानवे यांनी एकाचवेळी दुर्घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. विशेष म्हणजे माध्यमांशी बोलतांना दानवे-शिरसाट यांनी एकाच वेळी यावर भाष्य केले.

विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या घटनेबद्दल राज्य सरकार, प्रदूषण महामंडळ, एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरत औद्योगिक धोरणावरही टीका केली. (Marathwada) राज्यातील औद्योगिक परिसरात सातत्याने मनुष्यहानीचे अपघात घडत आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व कामगार विभाग अशा दुर्दैवी घटना घडत असताना कोणतेही सुरक्षेची काळजी घेत असल्याचे दिसत नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संभाजीनगर येथील वाळुज एमआयडीसीतील सनराईस एटरप्राईज या कंपनीत लागलेल्या आगीच्या घटनेत 6 कामगारांचा मृत्यू झाला. यात कंपनी मालकासह या घटनेला जबाबदार सर्वांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी दानवे यांनी केली.अंबादास दानवे यांनी सरकारच्या औद्योगिक धोरणांवर टीका केल्यानंतर शिरसाट काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष होते.

मात्र, शिरसाट यांनीही पक्षीय मतभेद विसरून घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत दानवेंच्या मागणीचे समर्थन केले. परप्रांतीय मजुरांना कामासाठी आणणारे ठेकेदार, कंपनी मालक त्यांची योग्य काळजी घेत नाहीत. एमआयडीसीचे अधिकारीही अशा कंपन्यांकडे दुर्लक्ष करतात आणि यातून अशा दुर्घटना घडतात. ज्यांचे जीव गेले ते परप्रांतीय असले तरी ती माणसं होती.

त्यामुळे सरकारकडून जी मदत द्यायची ती मिळेलच. पण या कंपनीच्या मालकावर आणि एमआयडीसीच्या दोषी अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा, अशी मागणी शिरसाट यांनीही केली. राज्य सरकारकडून मुख्यमंत्री सहायता निधीमधून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदतही जाहीर करण्यात आली. आता या प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई कधी होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT