Maratha Reservation: मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे आणि भाजपाचे आमदार आणि मुख्यमंत्री फडणवीसांचे विश्वासू सहकारी असलेले प्रसाद लाड यांच्यात 22 मे रोजी अंतरवाली सराटीमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. दीड तास माध्यमांसमोर आणि त्यानंतर बंद खोलीत झालेल्या चर्चेनंतर मराठा आरक्षणा संदर्भातील निर्णयाच्या अंमलबजावणी संदर्भात सरकारकडून ठोस आश्वासन जरांगे पाटील यांना मिळेल अशी अपेक्षा होती. पण या भेटीला सहा दिवस झाले तरी अद्याप सरकारकडून कुठलंही उत्तर त्यांना आलेलं नाही. त्यामुळं आता उद्या आंतरवली सराटीत पुन्हा पत्रकार परिषदेचं आयोजन जरांगेंकडून करण्यात आलं आहे.
जरांगे पाटील यांना पुन्हा उपोषण करण्याची वेळ येणार नाही, असा विश्वास प्रसाद लाड यांनी अंतरवाली सराटीतील भेटीत दिला होता. मात्र, या भेटीला सहा दिवस उलटून गेले तरी सरकारकडून जरांगेंना कुठलाही निरोप किंवा लेखी पत्र आलेले नाही. दोन अडीच तास चर्चा करून गेलेल्या प्रसाद लाड यांच्याकडूनही जरांगे यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संपर्क साधण्यात आलेला नाही. त्यानंतर आता उद्या, (ता. 28) रोजी सकाळी साडेदहा वाजता मनोज जरांगे पाटील अंतरवालीत पत्रकार परिषद घेणार आहेत.
31 मे पासून उपोषणाची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वीच केली आहे. प्रसाद लाड यांच्या भेटीनंतर जिल्ह्याजिल्ह्यात होणाऱ्या नियोजनाच्या बैठकाही रद्द करण्यात आल्या होत्या. प्रसाद लाड हे मुख्यमंत्र्यांचे दूत बनून आले होते. जरांगे पाटील आणि मराठा समाजाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर ते देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर सगळ्या गोष्टी घालणार होते. परंतू सहा दिवसानंतरही ना सरकारकडून काही निरोप आला आहे, ना आमदार प्रसाद लाड यांच्याकडून. त्यामुळं उद्या मनोज जरांगे पाटील माध्यमांशी बोलून आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
22 मे 2026 रोजी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी अंतरवाली सराटी इथं जाऊन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. 30 मे पासून सुरू होणाऱ्या जरांगे पाटलांच्या नियोजित बेमुदत उपोषणाच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये ऑन-कॅमेरा आणि बंद दाराआड चर्चा झाली. प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटलांना 'मोठे भाऊ' 'मनोजदादा' म्हणून संबोधले. 'मी इथे कोणताही राजकीय नेता किंवा आमदार म्हणून आलेलो नाही, तर एक सामान्य मराठा म्हणून आलो आहे. आपल्यातील गैरसमज आणि द्वेष दूर करण्यासाठी मी आलो असल्याचे लाड म्हणाले होते.
मनोज जरांगे यांनी 30 मे पासून सुरू होणारे बेमुदत उपोषण करू नये, अशी विनंती प्रसाद लाड यांनी या भेटीत केली होती. काही मागण्यांमध्ये असलेल्या कायदेशीर अडचणी सांगतानाच जर मराठा समाजाच्या अडचणी आणि प्रश्न सुटले नाहीत, तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईन, अशी स्पष्ट भूमिका लाड यांनी या भेटीत व्यक्त केली होती. या बैठकीत जरांगे पाटील यांनी सरकारसमोर आपल्या १० प्रमुख मागण्या मांडल्या होत्या. यात प्रामुख्याने सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करणे, मराठा उपसमिती बरखास्त करून स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करणे, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे, हैदराबाद गॅझेटच्या जीआरनूसार मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र वाटप करणे, वाटप केलेल्यांना वैधता देणे या मागण्यांचा समावेश होता.
तसेच सातारा, औंध, मुंबई गॅझेटचा अहवाल स्वीकारून ते लागू करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली होती. माझ्या मागण्या मान्य करा मी, उपोषण करणार नाही, असेही जरांगे पाटील यांनी सांगितले होते. मात्र, ही भेट आणि त्यामध्ये झालेली चर्चा वांझोटीच ठरली, असे म्हणावे लागेल. कारण उद्या मनोज जरांगे पाटील हे पत्रकार परिषद घेऊन पुन्हा 30 मे रोजीच्या उपोषणा संदर्भात सविस्तर भूमिका मांडण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.