Tanaji Sawant Sarkarnama
मराठवाडा

Tanaji Sawant : धाराशिवमधील सर्व कारखानदारांना आरोग्यमंत्री सावंतांचे ओपन चॅलेंज ! म्हणाले...

Sunil Balasaheb Dhumal

आनंद सुरवसे

Dharashiv Political News : मराठवाड्यातील सर्वात मोठा पंरतु मागील १२ वर्षांपासून बंद असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची धुराडी आता पेटली आहे. भैरवनाथ शुगर्सच्या माध्यमातून या वर्षीपासून तेरणा कारख्यान्याच्या गाळप हंगामाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, या कारखान्याच्या मोळीच्या शुभारंभप्रसंगी राज्याचे आरोग्यमंत्री आणि धाराशिवचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी ऊसदरावरून जिल्ह्यातील इतर साखर कारखानदारांना चॅलेंज दिले आहे. (Latest Political News)

तेरणाचा कारभार भैरवनाथ शुगर्सकडे

राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळप हंगामास १ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. त्याप्रमाणेच धाराशिव जिल्ह्यातील तेरणा सहकारी साखर कारखानाही सुरू झाला आहे. जिल्हा बँकेच्या कर्जापोटी हा कारखाना मागील १२ वर्षांपासून बंद होता.

दरम्यान, भैरवनाथ शुगर्स ग्रुपच्या वतीने सावंत बंधूंनी हा कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यास घेतला आहे. जानेवारीमध्ये भाडेकराराची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पहिल्यांदाच मंगळवारी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर भैरवनाथ शुगर्सकडून कारखान्यात ऊसगाळपाला सुरुवात झाली. या वेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते मोळी पूजनाचा कार्यक्रम पार पडला.

सर्वाधिक ऊसदराचे चॅलेंज !

मोळी पूजनावेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी ऊसदराचीही घोषणा केली. तेरणा साखर कारखाना शेतकऱ्यांचा उसाला प्रतिटन २८२५ रुपये इतका पहिला हप्ता देणार असल्याची घोषणा सावंत यांनी केली. ही घोषणा करताना सावंतांनी धाराशिव जिल्ह्यातील इतर साखर कारखानदारांना ऊसदरावरून ओपन चॅलेंज दिले.

'ज्या कोणत्या साखर कारखान्याला आमच्याशी स्पर्धा करायची आहे, त्यांनी ती करावी. आम्ही त्यांना खुले आव्हान देतो. जिल्ह्यात कोणताही कारखाना सर्वाधिक दर देईल, त्यापेक्षा प्रतिटन २१ रुपये जास्त दर तेरणा साखर कारखाना देईल', असे सावंतांनी जाहीर केले. (Maharashtra Political News)

कारखान्यावर चारशे कोटींचे कर्ज

धाराशिव जिल्ह्यातील ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्यांवर धाराशिव जिल्हा बँकेचे सुमारे चारशे कोटींचे थकीत कर्ज आहे. परिणामी मागील १२ वर्षांपासून कारखाना बंद आहे.

दरम्यान, जिल्हा बँकेने हा कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यास देण्यासाठी निविदा काढली होती. त्यामध्ये सावंत यांच्या भैरवनाथ शुगर्स समूहाला हा कारखाना २५ वर्षांच्या कराराने चालवण्यास देण्यात आला आहे. भैरवनाथ शुगर्सकडे आल्यानंतर प्रथमच गाळप सुरू करण्यात आले आहे. त्यातच सावंत यांनी सर्वाधिक ऊसदराची घोषणा केल्याने शेतकरी आणि सभासदांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT