Mumbai, 11 March : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणी धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. मात्र, हे प्रकरण लावून धरणारे भाजप आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर यांच्या किंवा त्यांच्या समर्थकांच्या विरोधातील प्रकरणे एकामागून एक बाहेर पडत आहेत. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वाल्मीक कराड आणि त्याच्या समर्थकांना आव्हान दिले आहे.‘ तुम्ही माझं कुठलंही प्रकरण बाहेर काढा, मला काहीही फरक पडत नाही, असे चॅलेंज त्यांनी दिले आहे.
भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांचे समर्थक सतीश भोसले ऊर्फ खोक्याभाई याचे प्रकरण बीडमध्ये गाजत आहे. पैसे फेकणे, पैस उधळणे, अमानुष मारहाण करणे या प्रकरणामुळे सतीश भोसले सध्या महाराष्ट्रभर गाजत आहे. या खोक्याभाईच्या माध्यमातून सुरेश धस यांच्यावर आरोप केले जात आहेत. त्यातून धस यांच्यासमोर अडचणी वाढविण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.
दुसरीकडे, आमदार प्रकाश सोळंके (MLA Prakash Solanke) यांच्या निकटवर्तीयाचेही एक प्रकरण गाजत आहे. त्यात त्यांचा एक निकटवर्तीय तहसीलदाराना शिवागाळी करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तसेच आमदार संदीप क्षीरसागर यांचीही नायब तहसीलदारांना धमकी देत असल्याची ऑडिओ क्लिप बाहेर आली आहे. त्यावर ही क्लिप दीड वर्षाची असून ती आताच का बाहेर आली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
धस, सोळंके, क्षीरसागर यांच्यानंतर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही या प्रश्नावर ठाम भूमिका घेतली आहे. त्यांना धस, सोळंके, क्षीरसागर यांच्याविरोधात निघणाऱ्या प्रकरणाबाबत विचारले असता ‘त्यांच्यानी काय फरक पडतो. माझंही एखादं प्रकरण बाहेर काढतील. काढलं तर काढलं. मी नाय कोणाला घाबरत असे उत्तर त्यांनी दिले.
अरे तुम्ही मर्डर केलाय, मर्डर. आम्ही मर्डर नाही केला. तुम्ही मर्डर केला, तोही क्रूर ऽऽ मर्डर केलाय...तुम्ही माझं कुठलंही प्रकरण बाहेर काढा, मला काहीही फरक पडत नाही. मी कोणालाही घाबरत नाही, असे सांगून आव्हाड यांनी उलट चॅलेंज दिले आहे.
आनंदाचा शिधा, शिवभोजन यासह अनेक योजना बंद करण्यात आल्या आहेत. आगामी काळात अनेक योजना पुढच्या सहा महिन्यांत बंद पडणार आहेत. निवडणुकीच्या अगोदर महायुतीचे नेते जे जे बोलले होते. ते अर्थसंकल्पात दिसतच नाही, असा टोलाही आव्हाड यांनी लगावला.
नीतेश राणे यांच्या नव्या फतव्यामुळे वाद निर्माण होऊ लागला आहे. हिंदू खाटकांकडूनच मटन घ्या. तसेच, मल्हार सर्टिफिकेशनचे मटन घ्या, असे आवाहन ते करत आहे. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देताना मल्हार सर्टिफिकेशन कोण देणार, हा पहिला प्रश्न उभा राहतो. मल्हार का नाव देताय, हे तर मल्हारराव होळकरांचं नावं आहे. हे देवदेवतांचे नाव आहे. ते नाव मटनाला देण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला. आम्हाला जे मटन खायाचे ते आम्ही खाऊ, तुम्ही कोण सांगणारे? असे आव्हान आव्हाड यांनी दिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.