Marathwada Politics News Sarkarnama
मराठवाडा

Marathwada Political News : अमित शहा येऊन गेल्यानंतर संभाजीनगरात तिसरी आघाडी सक्रीय

Jagdish Pansare

Marathwada Political News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अठरा मागण्याचा प्रस्ताव देऊन त्यावर निर्णय घेण्यासाठी दिलेली डेडलाईन संपल्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी, संभाजीराजे छत्रपती, आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील तिसऱ्या आघाडीचा आज छत्रपती संभाजीनगगरमध्ये मेळावा होतोय. परिवर्तन महाशक्तीच्या या संयुक्त मेळाव्याने राज्यात तिसरी आघाडी विधानसभेच्या मैदानात उतरणार हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसापुर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन गेले. भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांना चार्ज करतानाच त्यांनी महायुतीच्या (Marathwada) मराठवाड्यासह राज्यातील जागावाटपावर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी खलबते केली. शहा यांच्या शहरातील बैठकीला 48 तास उलटत नाही, तोच तिसऱ्या आघाडीचा आज मेळावा होत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीच्या विरोधात वातावरण होते हे स्पष्ट झाले. महाविकास आघाडीला याचा थेट फायदा राज्यात आणि विशेषतः मराठवाड्यात सर्वाधिक झाला. त्यामुळे महाविकास आघाडी-महायुतीसह सर्वच छोट्या-मोठ्या पक्ष आणि आघाड्यांनी आपला मोर्चा मराठवाड्याकडे वळवला आहे. दोन महिन्यापुर्वी प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू यांनी छत्रपती संभाजीनगरमध्येच दिव्यांगांचा भव्य असा मोर्चा काढत जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते.

महायुती सरकारचा भाग असलेले बच्चू कडू आता आपण त्यातून बाहेर पडलो आहोत, असे जाहीरपणे सांगत आहेत. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी वेगळा मार्ग निवडत तिसऱ्या आघाडीचा भाग होण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत कायम रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) हे देखील राज्यातील महायुती आणि केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत.

लोकसभा निवडणुकीपुर्वी तेलंगणातून महाराष्ट्राच्या राजकारणात दणक्यात एन्ट्री करणाऱ्या बीआरस अर्थात भारत राष्ट्र समिती पक्षाची आता वाताहत झाली आहे. अबकी बार किसान सरकारचा नारा देत वातावरण निर्मिती करणाऱ्या माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या पक्षात गेलेल्या महाराष्ट्रातील शेतकरी नेत्यांचा भ्रमनिरास केला. लोकसभा निवडणुकीत कुठलीच भूमिका न घेतलेल्या बीआरएसची तेलंगणातील सत्ताही गेली. त्यामुळे बीआरएसच्या गुलाबी स्वप्नातून बाहेर पडत माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी तिसऱ्या आघाडीचा भाग होणे पसंत केले.

या सर्व नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एकूण 18 मागण्याचा प्रस्ताव देत त्यावर 25 सप्टेंबर पर्यंत निर्णय घेण्याची मागणी केली होती. यावर विचार झाला नाही, तर तिसरी आघाडी विधानसभा निवडणुकीत सगळ्या जागा लढवेल, अशा इशारा तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांनी दिला होता. मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावकडे दुर्लक्ष केल्यानंतर आज छत्रपती संभाजीनगरमध्ये परिवर्त महाशक्तीचा संयुक्त मेळावा होत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून नाराज असलेले मनोज जरांगे पाटील, वंचित आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी या तिसऱ्या आघाडीचा भाग व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मात्र प्रकाश आंबेडकर यांनी एकला चलो ची भूमिका घेत विधानसभा निवडणुकीसाठी अकरा उमेदवारांची पहिली यादीही जाहीर केली आहे. तर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीत सुरु केलेले सहावे उपोषण मनोज जरांगे यांनी नवव्या दिवशी मागे घेतले. प्रकृती बरी नसल्याने सध्या ते संभाजीनगरमध्ये खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. जरांगे पाटील यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही.

288 उमेदवार उभे करण्याची भाषा जरांगे यांनी केली होती, परंतु काल उपोषण सोडतांना पाडापाडी झाली तर मला दोष देऊ नका, असे सांगत त्यांनी लोकसभे प्रमाणेच विधानसभेला आपण पाडापाडीच्याच भूमिकेत राहू, असे संकेत दिले आहे. अशावेळी महायुती-महाविकास आघाडीला सक्षम पर्याय देण्यात तिसरी आघाडी यशस्वी ठरू शकेल का ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT