Prakash Ambedkar, Ashok Chavan Sarkarnama
मराठवाडा

Ashok Chavan : वंचितमुळे काँग्रेसची चिंता मिटली; पण पारंपारिक 'वोट बँक' राखण्याचे मोठे आव्हान

Laxmikant Mule

Nanded Political News : प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग बनली आहे. अर्थात जागावाटप, कोणाच्या कोट्यातून किती जागा वंचितच्या वाट्याला येतात यावर पुढील गोष्टी अंवलबून असणार आहेत. आता एकदा वंचितला सोबत घेतले तर त्यांचे समाधान करण्याची जबाबदारीही आघाडीतील तीनही प्रमुख पक्षांच्या नेत्यांची असणार आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत वंचितमुळे काँग्रेसच्या अशोक चव्हाणांचा पराभव झाला होता.

आता तीच वंचित आघाडी (Vanchit) सोबत असल्याने काँग्रेसची चिंता काहीसी मिटली आहे. परंतु काँग्रेसची स्वतःची वोट बँक आणि एमआयएमकडे गेलेली पारंपारिक मते पुन्हा खेचण्याचे मोठे आव्हान काँग्रेससमोर (Congress) असणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या सर्वच पक्षांनी आपली पारंपारिक वोट बँक मजबूत करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेसची नजर आपल्या पारंपरिक मतदारांवर आहे. हा मतदार पक्षाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

अलीकडच्या काळात झालेल्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत प्रत्येक पक्षाला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीवर नजर टाकली तर काँग्रेसचे हक्काचे मतदार इतर पक्षांकडे वळाल्याचे दिसते. काँग्रेसला हमखास मते देणाऱ्या मतदारांनी पाठ फिरवल्यामुळेच या पक्षाला दहा वर्षांपासून राज्यात आणि देशातही सत्तेपासून दूर रहावे लागले आहे.

गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी व काँग्रेसच्या (Congress) आघाडीला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे आठ ते दहा जागा गमवाव्या लागल्या होत्या. आता महाविकास आघाडीत वंचितचा समावेश झाला आहे. वंचितला मिळालेली मते काँग्रेसच्या उमेदवाराला मिळावी यासाठी राज्यभरात विशेष प्रयत्न केले जात आहेत. गेल्या निवडणुकीत वंचितच्या उमेदवाराला 15 टक्के मते मिळाली होती. त्यामुळे नांदेडमधून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पराभव झाला होता.

वंचितची मते महाविकास आघाडीच्या (MVA) उमेदवाराला मिळाली तर विजयाचे गणित बदलू शकते, असे गृहीत धरून नियोजन केले जात आहे. महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडी यावी यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रयत्न केले होते. याचा पुढचा भाग म्हणून काँग्रेस दलित, मुस्लिम मतदार काँग्रेसकडे वळविण्यासाठी रणनीती आखली जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणुकीत पक्षाला चार ते पाच टक्के मतदान कमी अथवा जास्त झाले तर जय-पराजयाचे गणित बदलू शकते. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी छोट्या पक्षांना सोबत घेतले जात आहे. गेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला ४४ टक्के, काँग्रेसला ३९ टक्के तर वंचित बहुजन आघाडीला १५ टक्के मते मिळाली होती.

यावरून वंचितला मिळालेली मते किती महत्वाची आहेत, हे सहजपणे लक्षात येते. त्यामुळे पारंपारिक मत राखत वंचितच्या खात्याची मते महाविकास आघाडीच्या पदरात पडली तर राज्याच्या सत्तेत कमबॅक करता येईल. लोकसभा निवडणुकीत महाविकास-वंचित आघाडीला किता जागा मिळतात, यावरच विधानसभेचेही यश अवलंबून असणार आहे.

(Edited Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT