Shivsena News : चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यासारखे नास्तिक लोक घेऊन आम्हाला पक्ष बिघडवायचा नाही. त्या दोघांनी तिकडेच राहावे आणि तिकडेच राखण करावी, अशा शब्दांत पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी खैरे आणि दानवे यांच्या शिंदे गटातील प्रवेशाला तीव्र विरोध असल्याचे स्पष्ट केले. दैनिक सकाळ च्या 'थेट भेट'उपक्रमात आमदार भुमरे यांनी अनेक विषयांवर दिलखुलास संवाद साधला.
मागील काही दिवसांपासून पालकमंत्री संजय शिरसाट यांनी खैरे यांच्या (Shivsena) शिवसेना (शिंदे) प्रवेशाबाबत विधाने केल्याने पुन्हा तो विषय ऐरणीवर आला होता. त्याबाबत आमदार भुमरे यांनी थेटच भूमिका घेतली. ते म्हणाले, ज्यांचे काहीच अस्तित्व उरलेले नाही, त्यांना घेऊन आम्ही काय करणार? ज्यांच्यामुळे छत्रपती संभाजीनगर विकासापासून, पाण्यापासून वंचित राहिले अशांना घेऊन काहीच फायदा नाही.
अंबादास दानवे यांच्या शिवसेना प्रवेशाबद्दलही अशीच तिखट भूमिका घेत भुमरे यांनी स्पष्ट नकारच दिला. (Chandrakant Khaire) खैरे आणि दानवे या दोघांनी तिकडेच राहावे, मुंबईतही दोघे आहेत, आणि इकडे हे दोघे आहेत. शिंदे यांच्या शिवसेनेत येण्यापेक्षा दानवे-खैरे यांनी तिकडेच राखण करावी. असल्या नास्तिक लोकांना घेऊन आम्हाला आमचा पक्ष बिघडवायचा नाही.
विरोधकांना पंक्चर केले
लोकसभा निवडणुकीत विलास भुमरे यांनी खासदार संदीपान भुमरे यांची सारी निवडणूक यंत्रणा हाताळली होती . राज्यात महाविकास आघाडीचे वातावरण असताना मराठवाड्यात फक्त छत्रपती संभाजीनगरची जागा तेवढी संदीपान भुमरे यांनी जिंकली. त्या मागची रणनीती काय होती ते सांगताना आमदार भुमरे म्हणाले की, आम्ही विरोधकांनाच पंक्चर करण्याची रणनीती ठेवली आणि त्यात यशस्वी झालो.
आमच्या ताकदीचे चित्र त्यामुळे निर्माण झाले. आम्ही खोडांना हात लावत नाही, फक्त फांद्या छाटतो. फांद्या छाटल्या की खोडाचा बॅलन्स जातो,तेच केले. वास्तविक खैरे आणि दानवे यांनी आत्मचिंतन केले असते तर आम्हाला स्थिती निश्चितच अवघड झाली असती. त्याशिवाय आम्ही सगळ्या पक्षांना सोबत घेतले, अगदी मनसे आणि भाजप यांनाही सहभागी करून घेतले त्यामुळे यश मिळू शकले.
झेडपी, मनपा आमचीच
जिल्हा परिषद आणि मनपा निवडणूक कधी होणार? या वर्षात अवघड आहे. पण आज जरी निवडणुका लागल्या तरी झेडपी आणि मनपा आमचीच राहील याची आम्हाला खात्री आहे. मध्यंतरी काही विषय होते, वातावरणही योग्य नव्हते. विधानसभा निवडणुकाही सहा महिने पुढे जातात की काय? असे आम्हालाही वाटत होते, पण निवडणूक झाल्या. तशाच आता बाकीच्या निवडणुकाही होतील.
मंत्रिपद ठाकरेंमुळे मिळाले नाही
संदीपान भुमरे यांनी रोहयो मंत्री, पालक मंत्री असताना शेतकऱ्यांसाठी जी कामे केली त्याचा फायदा आम्हाला लोकसभेत झाला, असे विलास भुमरे म्हणाले. पण हे मंत्रिपद तर उद्धव ठाकरे यांच्यामुळे मिळाले होते असे स्वत: संदीपान भुमरे म्हणाले होते असे निदर्शनास आणून देताच विलास भुमरे म्हणाले, माझ्या वडिलांना उद्धव ठाकरे यांच्यामुळे मंत्रिपद मिळालेले नाही. ते फक्त एकनाथ शिंदे यांच्यामुळेच मिळाले. त्यांनी शब्द टाकला आणि आग्रहाने मंत्रिपद मिळवून दिले. त्या बाबत झालेल्या सगळ्या घडामोडींचा मी साक्षीदार आहे. एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यांना मी त्यासाठी सतत भेटत होतो. पण काम केले ते शिंदे यांनीच.
सत्तार निवडणूक लढणार नाहीत..
सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांची जातीपतीच्या गणितांमुळे खूप अडचण झाली. ते निवडून आले, पण त्यांनी आपली खंतही मला बोलून दाखवली. सभागृहातही आम्ही शेजारी बसतो. तेव्हाही सत्तार यांनी आपण पुढची निवडणूक लढवणार नाही, असे सांगितले असल्याचे आमदार भुमरे एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.