राम काळगे
निलंगा : निलंगा विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर झाल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने कार्यकर्ते निकालाचे चिंतन करीत आहेत. त्यातच काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसचे पराभूत उमेदवार अभय साळुंके यांच्यावर 'उपरा' म्हणून सडकून टीका केली. तर त्या टीकेला अभय साळुंके यांनी पलटवार करून प्रत्युत्तर दिले. त्यामुळे निलंगा मतदारसंघात काँग्रेसच्या दोन गटात 'निष्ठावंत कोण' यावरून जुंपली आहे.
त्यामुळे या अंतर्गत वादाबाबत आता पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. (Congress) निलंगा मतदारसंघाला देश व राज्य पातळीवर लौकिक मिळवून देणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री दिवंदत डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी त्यांची संपुर्ण हयात काँग्रेस पक्षामध्ये घालवली. एकेकाळी लातूर जिल्ह्यात त्यांना विचारल्याशिवाय पक्षात कुठलाच निर्णय घेतला जात नसयाचा.
मात्र आज त्यांच्याच राजकीय वारसांची काँग्रेस पक्षात परवड होताना दिसत आहे. (Latur) जिल्ह्यावर जेष्ठ नेते शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी समन्वय ठेवत एकमुखी सत्ता केंद्र ताब्यात ठेवली होती. राजकीय निर्णय घेताना एकमेकांशी विचार-विनीमय करून निर्णय घेतला जायचा. मात्र सध्या राजकीय परिस्थिती बदलली आहे.
निलंगा विधानसभा मतदारसंघातून या निवडणुकीत काँग्रेसने 62 वर्षांपासूनची परंपरा खंडित करत अभय सोळुंके यांना उमेदवारी दिली. ही उमेदवारी केवळ माजी मंत्री अमित देशमुख यांच्यामुळेच देण्यात आली असल्याचे शल्य निलंगेकर समर्थक आणि काँग्रेसमधील निष्ठावंतांना आहे. यापूर्वीही अभय सोळंके यांना पाठबळ देण्याचे काम लातूरातून होत असल्यामुळे निष्ठावंत निलंगेकर विरुद्ध देशमुख असा संघर्ष विधानसभा निवडणुकीत निर्माण झाला होता.
तरीही अशोक पाटील यांनी भरलेला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेत काँग्रेस उमेदवाराचा प्रचार केला. परंतु प्रचार संपण्याच्या दिवशी निलंगा येथे साळुंके यांनी अशोक पाटील यांच्यावर केलेली वैयक्तिक टीका त्यांच्या जिव्हारी लागली. सोशल मीडियावर याची चर्चा काँग्रेसमधील निलंगेकर विरोधक व तालुक्यातील इतर पक्षाच्या विरोधकांनीही केली. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दोन आठवड्यानी पत्रकार परिषद घेऊन अशोक पाटील यांनी पराभूत उमेदवारावर टीका करत थेट मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला.
आम्ही निष्ठावंत काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत अनेक पक्ष बदलून आलेल्यांना आम्ही भीक घालत नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. तर अभय साळुंके यांनी निवडणूक काळात पक्ष विरोधी काम केले म्हणून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पक्षश्रेष्ठीकडे केली आहे. शिवाय प्रसिद्धी पत्रकाद्वारे 'निष्ठावंत व अब्रू' हे अशोकरावांच्या तोंडून शोभत नाही अशी कडक शब्दात टीका केली. त्यामुळे निलंगा काँग्रेस मधील दोन गटातील वाद या निमित्ताने चव्हाट्यावर आला असून खरा 'निष्ठावंत कोण'? यातून तालुक्यात काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत.
आता अशा परिस्थितीत कार्यकर्ते संभ्रमात असून जुन्या व नव्या गटात निर्माण झालेल्या वादात कार्यकर्त्याची मात्र फरपट होताना दिसते आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षश्रेष्ठी या दोन गटांना एकत्रित करून निवडणूकीला सामोरे जाणार का? जेष्ठ नेते म्हणून अशोकराव यांच्या नेतृत्वाखाली अभय साळुंके यांना व कार्यकर्त्यांना काम करावे लागणार का? असा प्रश्न यानिमित्तान निर्माण झाला आहे. याबाबत पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेते याकडे निलंगेकरांचे लक्ष लागले आहे. निलंगेकर यांचे वर्चस्व तालुक्यातून व जिल्ह्यातून कमी करण्याचा 'गढी' चा प्रयत्न अभय साळुंके यांच्या पराभवाने फसला. आता राज्य पातळीवरून काही करता येते का? याची चाचपणी केली जात असल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.