Beed Politics News : सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात मुख्य आरोपी वाल्मीक कराड याच्याशी संबंध असल्याच्या कारणावरून धनंजय मुंडे यांचे मंत्री पद आमदार सुरेश धस आणि जनरेट्यामुळे गेले. कृषी मंत्री असताना या खात्यात झालेल्या दोनशे कोटीच्या घोटाळ्याची तक्रार धस ईडीकडे करणार आहेत. आता परळी नगरपरिषदेकडे आपण वळणार आहोत, असा इशाराही धस यांनी दिला आहे.
जगभरातल्या सगळ्या योजना परळी नगरपरिषदेच्या माध्यमातून राबवल्या जातात. मोठ्या प्रमाणात पैसा येत असल्याने खंडणी, टोळ्या तयार करणे असे प्रकार सुरू झाल्याचा दावाही धस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतून केला. (Parli) परळी नगरपरिषद अजून यायची आहे. अजून मी येथील घोळ काढला नाही. पण लवकरच हा घोळ मी बाहेर काढणार आहे, असेही धस यांनी सांगितले.
सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाने बीड जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले. या प्रकरणाने अनेक टोळ्या, आरोपी, खंडणी व खून प्रकरणे नव्याने बाहेर आली. वाल्मीक कराडसह सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात अटकेत असलेले आरोपी आणि त्यांना लाभलेला वरदहस्त याची गेल्या तीन महिन्यांपासून राज्यात चर्चा सुरू आहे. मंत्री (Dhananjay Munde) धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला.
परंतु एवढ्यावरच हे प्रकरण थांबलेले नाही. या सगळ्या प्रकरणात पुढाकार घेऊन आघाडीवर असलेल्या भाजपा आमदार सुरेश धस हे ही आपला कार्यकर्ता सतीश भोसले याच्याकडून एका व्यक्तीला झालेल्या बेदम मारहाणीच्या व्हायरल व्हिडिओने गोत्यात आल्याचे चित्र आहे. भोसले हा धस यांचा कट्टर समर्थक असल्याने त्याच्या प्रत्येक प्रकरणाशी त्यांचाही संबंध जोडला जात आहे. धस यांनी सगळे आरोप फेटाळत सतीश भोसले माझा कार्यकर्ता असला तरी त्याच्यावर कारवाई करा, अशी भूमिका घेतली आहे.
सतीश भोसले प्रकरणात घेरण्याचा प्रयत्न होत असताना सुरेश धस आणखी आक्रमक झाले आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत धस यांनी अनेक गोष्टींचा उलगडा केला. परळी नगरपरिषदेतील घोळ आपण लवकरच बाहेर काढणार आहोत, असे धस यांनी म्हटले आहे. सगळ्यात मोठा घोळ तिथे असल्याचा दावा करत जगातल्या सगळ्या योजना तिथे झाल्याचा टोला त्यांनी लगावला. योजनेसाठी मोठ्या प्रमाणात नगरपरिषदेला पैसा मिळाला.
हा पैसा यांना शांत बसू देत नव्हता, त्यातून खंडणी मागणे, टोळ्या तयार करण्याचे प्रकार झाले. माझ्या पाटोदा तालुक्यात अनेक कंपन्यांची कामे यांनी बंद पाडली. अवादा कंपनीला खंडणी मागितली हा काही पहिला प्रकार नव्हता. त्याआधी त्यांनी अनेक कंपन्यांकडून खंडणी मागितल्या आहेत. पाटोद्यात काही कंपन्यांकडून त्यांनी आम्हाला एवढे पैसे द्या, नाहीतर तुमचे काम बंद करा, अशा धमक्या देत खंडणी उकळली आहे. यासाठी स्थानिक तरुणांच्या टोळ्याही पाटोद्यात तयार केल्या होत्या, असा आरोपही धस यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.