Ahmednagar Politics  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ahmednagar Politics : उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहिल्याने टार्गेट केलं जातंय; शंकरराव गडाख स्पष्टच बोलले!

Pradeep Pendhare

Ahmednagar Political News : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते व माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी भाजप-महायुती सरकारकडून आपल्याला टार्गेट केला जात असल्याचा दावा केला आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिल्यानेच जाणीवपूर्वक निधी वाटपात टाळले गेल्याचा आरोप आमदार गडाख यांनी केला.

नेवासे तालुक्यातील पाचेगांव आणि परिसराला वरदान ठरणाऱ्या बंधाऱ्यातील पाण्याचे जलपूजन आमदार शंकरराव गडाख आणि माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या उपस्थितीत झाले. त्यावेळी आमदार गडाख यांनी समन्यायी पाणी वाटप कायद्यावर पुन्हा भाष्य केले. (Latest Marathi News)

आमदार गडाख म्हणाले, "पाचेगाव आणि पुनतगाव परिसरातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी रस्त्यावर उतरून कितीही मोठा संघर्ष करण्याची आपली तयारी आहे. नगर जिल्ह्याला समन्यायी पाणी वाटप कायदा हे ग्रहण आहे. आपल्यावर अन्याय करणारा हा कायदा आहे. यात बदल व्हावा, यासाठी आपण सामूहीक प्रयत्न करणे गरजेचे आहे".

"कायद्यामुळे नगर जिल्ह्यातील हक्काचे पाणी जे शेतकर्‍यांच्या वाट्याला यायला पाहिजे, ते पळवले जात आहे. राजकीय पातळीवर लढा लढला जातो, पण त्याला जनतेकडून देखील सामूहीक प्रयत्नांची गरज आहे," असे आवाहनही आमदार गडाख यांनी केले.

'पाचेगाव आणि परिसरात रस्त्याचे काम सुरू झाले आहे. ही कामेही लवकरात लवकर पूर्ण होतील. पाचेगाव बंधाऱ्यासाठी हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. हक्काच्या प्रश्नासाठी सदैव संघर्ष करत राहू. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहिलो आहे.

त्यामुळे भाजप महायुतीकडून मला जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे. राज्य सरकारकडून निधी वाटपात अन्याय केला गेला. यात नेवासा तालुक्याला निधी देण्यात टाळले गेले', असेही आमदार गडाख यांनी यावेळी सांगितले.

माजी आमदार भानुदास मुरकुटे यावेळी म्हणाले, पाचेगाव आणि पुनतगाव बंधारे पाण्याने भरल्यामुळे पिकांना अडचण येणार नाही. समन्यायी पाणी वाटप कायद्यातील पाण्याचे पुन्हा फेरनियोजन होणे गरजेचे आहे. हे फेरनियोजन न झाल्यास आगमी दुष्काळात नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांवर मोठा अन्याय होईल.

दुष्काळाला सामोरे जावे लागले. यासाठी न्यायालयीन आणि रस्त्यावरचा संघर्ष करण्याची आपली तयारी आहे. पाटपाणी, वीजेसाठी सरकार विरोधात संघर्ष करावाच लागेल, असेही माजी आमदार मुरकुटे यांनी म्हटले.

समन्यायी पाणी वाटपाचे फेरनियोजन करताना निळवंडे धरणातून बंधारे भरण्यासाठी दोन ते तीन टीएमसी पाणी राखीव करण्यासाठी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न करू. तुम्ही जनतेने त्यांना साथ द्या, असेही आवाहन माजी आमदार मुरकुटे यांनी केले. पाचेगाव, पुनतगाव, इमामपूर, गोणेगाव, निंभारी, नेवासा बुद्रुक, खुपटी आणि परिसरातील विविध संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT