Anil Desai Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shivsena MLA Disqualification : शिंदे गटाचे आमदार अपात्र होणारच; अनिल देसाईंनी सांगितले कारण...

Rahul Gadkar

Maharashtra Political News : शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गटाच्या आमदारांवर कारवाईची काही हालचाल करीत नाहीत, म्हटल्यावर आम्हाला कोर्टात जावे लागले. कोर्टाने 31 डिसेंबरपर्यंत निर्णय देण्याची सूचना दिली. मात्र विधिमंडळाच्या अध्यक्षांनी 10 जानेवारीपर्यंतची मुदत वाढवून मागितली. आता याबाबत उद्या निर्णय येईल. यावेळी शिंदे गटाचे आमदार अपात्र होतील यात काही शंका नाही, असा विश्वास ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी व्यक्त केला.

शिंदे गट कशा रीतीने पक्षाच्या विरोधी वागला? पक्षाने अधिकृतपणे बोलावलेल्या बैठकीला आले नाहीत. व्हीप लागू करण्यात आला होता, त्यावेळीही पक्षाच्या विरोधी मतदान केले. या सगळ्या कारणांनी हे अपात्र होतील, अशी माहितीही देसाईंनी यावेळी दिली. त्यामुळे राज्यातील सत्तासंघर्षाच्या पेचावरील उत्तर काय असणार, याकडे लक्ष लागले आहे.

अनिल देसाई (Anil Desai) म्हणाले, 'लोकशाहीला साजेसा निकाल येईल अशी आशा आहे. जगात आपली लोकशाही सगळ्यात मोठी आहे. दबावतंत्र, धाडीतंत्र हे आपण पाहत आलो आहे. तपास यंत्रणांचा गैरवापर केला जातोय. महाराष्ट्रात जी चुकीची संस्कृती आणली आहे, ती लोकांना माहिती आहे. लोक आता निवडणुकीची वाट पाहत आहेत,' असेही देसाईंनी सांगितले.

अयोध्या येथील राम मंदिराचे २२ जानेवारी रोजी लोकार्पण होणार आहे. यावर देसाई म्हणाले, 'बाबरी पडणारे शिवसैनिक आहेत. हे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब यांनी बोलण्याचे धाडस दाखवले. बाळासाहेबांचे स्वप्न होते राम मंदिर व्हावे. ज्यावेळी तारीख पे तारीख सुरू होती, त्यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackray) अयोध्येला जाऊन आले. त्यामुळे नरेंद्र पाटील यांनी राम मंदिरावर मालकी हक्क सांगू नये, मंदिर सर्वांचं आहे,' असेही देसाईंनी सांगितले.

लोकसभेची निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत (MVA) जागावाटपावरून दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडत आहे. यावर देसाईंनी सांगितले, जागावाटप कसे व्हावे, यासाठी सगळ्यांना विचारात घेऊन निर्णय होईल. घटकपक्षांचे मुंबईत दावे होत आहेत. त्याचाही विचार होईल. सर्वस्वी अधिकार उद्धव ठाकरे यांना आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, केंद्र सरकारकडून बुलेट ट्रेनचा प्रकल्प रेटला जात असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. 'बुलेट ट्रेनची गरज काय आहे, नागरी सुविधा चांगल्या करा. जे रेल्वेचे जाळे सध्याच्या घडीला आहे ते विस्तारित करा. सर्वसामान्य नागरिकांना बुलेट ट्रेन नको आहे,' अशा शब्दांत देसाईंनी केंद्राच्या बुलेट ट्रेनच्या प्रकल्पावर टीका केली.

(Edited by Sunil Dhumal)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT