Solapur, 29 November : विधानसभा निवडणुकीतील मानहानीकारक पराभवानंतर महाविकास आघाडीत आता भांडण्यास सुरुवात झाली आहे. पराभवाचे विश्लेषण करताना एकमेकांवर दोषारोप केले जात आहेत. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदरसंघातील काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या पराभवाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जबाबदार आहे, त्यांनी उमेदवार दिल्यानेच भालकेंचा पराभव झाला आहे, असा आरोप काँग्रेसच्या सोलापुरातील नेत्यांनी चिंतन बैठकीत केली आहे. तसेच, सोलापूर दक्षिणमध्ये दिलीप माने यांना पक्षाने एबी फार्म द्यायला हवा होता, असा मुद्दाही नरोटे यांनी मांडला.
पंढरपूर मतदारसंघात (Pandharpur Constituency) महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही अनिल सावंत यांना एबी फार्म देत उमेदवारी दिली होती. मात्र, भाजपचे समाधान आवताडे आणि काँग्रेसचे भगीरथ भालके यांच्यात लढाई झाली. त्यात भालके यांचा आवताडे यांच्याकडून 8 हजार 430 मतांनी पराभव झाला.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसकडून (Congress) अपयशाची कारणे जाणून घेतली जात आहेत. या बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री नसीम खान, भाई जगताप यांच्यासह काँग्रेसचे प्रदेश पातळीवरील नेते सहभागी झाले होते. शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी पंढरपूरमधील पराभवाला मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसवर ठपका ठेवला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने (NCP SP) पंढरपुरात आघाडीचा धर्म पाळला नाही. अनिल सावंत यांना एबी फार्म दिला. त्या निवडणुकीत भालके यांना 1 लाख 16 हजार 733 मते, तर समाधान आवताडे यांना 1 लाख 25 हजार 163 मते मिळाली आहेत.
दुसरीकडे अनिल सावंत यांना 10 हजार 217 मते मिळाली आहेत. यात भालकेंचा अवघ्या 8 हजार 430 मतांनी पराभव झाला आहे. सावंत यांनी ही दहा हजार मते घेतल्यामुळे भालकेंचा पराभव झाला, असा ठपका नरोटे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर ठेवला आहे.
सोलापूर दक्षिण मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस पक्षाला विश्वासात न घेताच अमर पाटील यांची उमेदवारी घोषित केली. वास्तविक, सोलापूर दक्षिण मतदारसंघात काँग्रेसचे दिलीप माने हे सर्वाधिक ताकदवान उमेदवार होते. त्यांना एबी फार्म मिळायला हवा होता, माने यांना उमेदवारी नाकारणे हे नुकसानकारक ठरले. सोलापूर दक्षिणमध्ये माने यांना एबी फार्म द्यायला हवा होता, असे नरोटे यांनी ठासून सांगितले.
पवारांनी जाणून घेतली कोठेंच्या पराभवाची कारणे
दरम्यान, सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार महेश कोठे यांच्या पराभवाची कारणे शरद पवार यांनी जाणून घेतली. पक्षवाढीसाठी काय करायला पाहिजे, अशी विचारणाही त्यांनी प्रत्येक उमेदवारला केली, असेही सांगण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.