Karad, 05 March : कोणी काहीही म्हणो, सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचाच होणार, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांनी केला आहे. लगेचच तिसऱ्यांदा सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भाजपचाच होणार, असा पुनर्रुच्चार आणि दावा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे. त्यामुळे अध्यक्ष कोणत्या पक्षाचा होणार याची जिल्हावासीयांना उत्सुकता आहे.
दरम्यान महायुती म्हणून जर भाजपला झेडपीच्या सत्तेत घेतले, तर सातारा (Satara) जिल्ह्यातील सातारा, कऱ्हाड, खटाव, जावळी, माण पंचायत समितीतही भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेला सभापती, उपसभापतिपद द्यावे, अशी ठाम मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे, त्यामुळे भाजप राष्ट्रवादीची ही अट मान्य करणार का, याचे औत्सुक्य आहे.
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीचा मुद्दा भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) आणि शिवसेनेसाठी प्रतिष्ठेचा बनला आहे. जिल्हा परिषदेसाठी मतदारांनीही निकालातून कोणालाच स्पष्ट कौल दिला नाही. जिल्हा परिषदेच्या ६५ सदस्यांपैकी भाजपचे २७, राष्ट्रवादी काँग्रेसचे २०, शिवसेनेचे १५, काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रत्येकी एक आणि भाजपचे बंडखोर एक अपक्ष सदस्य असा कौल मतदारांनी दिला आहे.
दरम्यान, भाजपचे (BJP) जिल्ह्यातील नेते आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी तीनवेळा जिल्हा परिषद अध्यक्ष हा भाजपचाच होणार अशी गर्जना करत आमचे २८ सदस्य आहेत. ते जिल्ह्यात सर्वाधिक असल्याने अध्यक्षपद हा आमचा अधिकारही आहे, असे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर अध्यक्षपदासाठी जे काय करायला लागेल, ते करायची आमची तयारी आहे आणि ते आम्ही करु, असे ठणकावून सांगत झेडपी अध्यक्षपदाचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः सोडवतील, असा विश्वासही व्यक्त केला आहे, त्यामुळे मंत्री गोरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते मंत्री मकरंद पाटील आणि शिवसेनेचे नेते मंत्री शंभूराज देसाई यांचे टेन्शन पुन्हा वाढवले आहे.
जिल्हा परिषदेच्या निकालात भाजप मोठा पक्ष राहिला असला तरी सत्तेच्या चाव्या शिवसेनेच्या हाती राहिल्या आहेत. भाजपला सहा जागा कमी पडत असून, सत्तेसाठी तडजोडी, वाटाघाट्या सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी व शिवसेनेही सावध पवित्रा घेत भाजपला अंधारात ठेवत पडद्यामागे राजकीय हालचाली सुरू केलेल्या आहेत. पालकमंत्री देसाई यांनी भाजपसोबत चर्चा झाल्यास मकरंद पाटील यांना सोबत घेणार असल्याचे सांगितल्याने राजकीय समीकरणाचा गुंता वाढत चालला आहे.
दरम्यान, अजितदादांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सोळसकर यांनी झेडपीचा अध्यक्ष हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचाच होणार असे जाहीर केले आहे. मात्र पालकमंत्री देसाई यांच्याकडुन शिवसेनेतर्फे अध्यक्षपदावर दावा न करता सावध भुमिका घेतली आहे. मात्र भाजपकडुन झेडपीचा अध्यक्ष हा आमचाच होणार असा वारंवार दावा केला जात आहे. त्यावर आता काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा महायुतीचा होणार असेल तर जिल्ह्यातील सातारा, कऱ्हाड, खटाव, जावळी, माण या पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेचे सदस्य निवडून आले आहेत. तेथीलही सभापती, उपसभापतिपद हे राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेला द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली आहे.
जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये पंचायत समितीसाठी भाजपने स्वबळावर निवडणुका लढवल्या. त्यात कऱ्हाड पंचायत समितीत भाजपचे स्पष्ट बहुमत आहे. भाजपला १३ जागा असून दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या ११ जागा आहेत. येथे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी व मित्रपक्ष वेगवेगळे लढले. पण बहुमत मात्र भाजपचे झाले. साताऱ्यातील १६ जागापैकी १० जागा या भाजपला तर राष्ट्रवादीला पाच आणि शिवसेनेला एक जागा मिळाली आहे. त्यामुळे तेथेही भाजपचेच बहुमत आहे.
खटाव तालुक्यातील १४ जागांपैकी भाजपला आठ आणि राष्ट्रवादीला सहा जागा मिळाल्या आहेत. जावळीमध्ये सहा जागांपैकी भाजपला तीन, शिवसेनेला दोन तर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पक्षाला एक जागा मिळाली आहे. माण पंचायत समितीच्या १० जागांपैकी भाजपला पाच, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला पाच जागा मिळाल्या आहेत. या पाचपैकी चार पंचायत समितीत भाजपचा सभापती व उपसभापती होऊ शकतो, असे चित्र स्पष्ट असल्याने येथे सत्ता स्थापन करण्याचा विषय शिवसेना, राष्ट्रवादी युतीने सोडून दिला होता. मात्र, राज्य आणि केंद्रात महायुतीतील पक्षांची सत्ता आहे. ही महायुती जिल्ह्यातही असावी, अशी भाजपची भूमिका आहे.
भाजपने निवडणूक स्वतंत्र लढवली आहे तर राष्ट्रवादी, शिवसेना आणि मित्र पक्षांनी एकत्र लढवली आहे. त्यामुळे यावेळी भाजपला बहुमत नसतानाही नेत्यांकडून भाजपचा अध्यक्ष होईल, असे जाहीर केले जात आहे. मग तोच न्याय जेथे भाजपची सत्ता आली आहे, त्या तालुक्यातही पंचायत समिती सभापती, उपसभापती पद राष्ट्रवादी आणि शिवेनेला द्यावे, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. सध्या राजकीय वर्तुळात त्याची चर्चा सुरु झाली आहे.
‘झेडपीत जो न्याय तोच पाच पंचायत समितीतही लावा’
भाजपकडून सातारा जिल्हा परिषदेत बहुमत होत नसतानाही अध्यक्ष, उपाध्यक्ष महायुती म्हणून तीनही पक्षांचा निवडला जावा, अशी भूमिका घेतली जात असेल तर सातारा, कऱ्हाड, खटाव, जावळी, माण पंचायत समितीमध्येही भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेला सोबत घेतले पाहिजे. जिल्ह्यात जो न्याय तोच जिल्ह्यातील पाच तालुक्यांतही लागू करुन सभापती, उपसभापतिपद मित्रपक्षाला दिले पाहिजे, अशी भूमिका सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दलाचे उपाध्यक्ष धनाजी पाटील यांनी मांडली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.