Manohar Joshi Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Manohar Joshi News : आमदाराची राजीनाम्याची धमकी अन्‌ मुख्यमंत्री जोशींनी सिंचन योजनेचे थेट भूमिपूजनच केले!

Vijaykumar Dudhale

Solapur News : उत्तर सोलापूर तालुक्यातील जिरायती भागाला पाणी देण्यासाठी शिवसेनेचे तत्कालीन तरुण आमदार उत्तमप्रकाश खंदारे यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. शिरापूर उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळाली नाही, तर मी आमदारकीचा राजीनामा देईन, अशी धमकी त्यांनी दिली होती. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी शिरापूर उपसा सिंचन योजनेला मंजुरी दिली आणि भूमिपूजनही केले. आज त्याच योजनेतून उत्तर सोलापूर तालुक्यातील काही गावांना उजनीचे पाणी मिळते. (North Solapur News)

राज्यात १९९५ मध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले आणि शिवसेनेचे मनोहर जोशी राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्या सेनेच्या लाटेत उत्तर सोलापूर मतदारसंघातून उत्तमप्रकाश खंदारे हे नवखे आणि तरुण आमदार झाले होते. मात्र, काँग्रेस नेत्यांनी वर्षानुवर्षे राज्य केलेल्या या तालुक्यात उजनीचे पाणी आणण्याचा निर्धार खंदारे यांनी केला होता. तसा शब्द त्यांनी प्रचार सभांमधून तालुक्यातील जनतेला दिला होता. त्या पद्धतीने त्यांनी कामााला सुरुवात केली हेाती. (Uttamprakash Khandare News )

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा त्यावेळी एक शिरस्ता होता. ते प्रत्येक बुधवारी शिवसेनेच्या आमदारांना स्वतंत्रपणे भेटायचे. त्यामुळे आमदारांना मुख्यमंत्र्यांशी मोकळेपणाने बोलता येत होते. खंदारे हे मुख्यमंत्री जोशी यांना भेटायला गेले. ‘लोकांनी मला याच मुद्द्यावर निवडून दिलं आहे. सोलापूर शहराच्या हद्दवाढ भागातील पिण्याचा पाण्याचा आणि ग्रामीण भागातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे. तो प्रश्न सुटला नाही, तर मी आमदारकीचा राजीनामा देतो,’ अशी धमकी खंदारे यांनी दिली होती. खंदारे यांच्यासोबत नान्नजचे किशोर पाटील आणि वडाळ्याचे बाबासाहेब आवताडे हेही या योजनेसाठी पाठपुरावा करत होते. (Ujani Dam Water Issue)

त्या भेटीनंतर मुख्यमंत्री जोशी यांनी शिरापूर उपसा सिंचन योजनेच्या संदर्भात तातडीने पाटंधारे विभागाची बैठक बोलावली. तत्पूर्वी बच्छावत आयोगाच्या अहवालानंतर जोशी यांनी राज्याचे हिश्श्याचे पाणी अडवण्यासाठी ऐतिहासिक निर्णय घेतला होता. आपल्या हिश्श्याचे वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी त्यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाची निर्मिती केली होती. त्या अंतर्गतच सुमारे १०० कोटी रुपयांच्या शिरापूर उपसा सिंचन योजनेला मंजुरी दिली. या योजनेसाठी पाणी शिल्लक आहे का, असा मुद्दा तत्कालीन पाटबंधारे मंत्री महादेवराव शिवणकर यांनी उपस्थित केला. तत्कालीन अधिकाऱ्यांनी १३ टीएमसी पाणी शिल्लक असल्याचे दाखवून देताच पाटबंधारे विभागाचा हिरवा कंदील मिळाला.

शिरापूर उपसा सिंचन योजनेचे १३ जून १९९७ रोजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी वडाळ्याच्या शरद सूत मिलजवळच्या माळरानावर भूमिपूजन केले. त्यानंतर नान्नजमध्ये शेतकरी मेळावा झाला. त्या मेळाव्यात बोलताना आमदार खंदारे यांनी ‘मला मंत्रिपद नको. माझ्या तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी दिले. आता साखर कारखाना द्या, अशी मागणी केली होती.

त्यावर मुख्यमंत्री जोशी यांनी साखर कारखाना मंजूर करतो, तुम्ही कामाला लागा, असे सांगितले होते. ‘पाणी आडवा आणि पाणी जिरवा’ प्रमाणे तालुक्यात काँग्रेसच्या लोकांनी सर्वसामान्यांची अडवणूक केलेली आहे, त्यातून पिचलेल्या शेतकऱ्यांना आपल्याला बाहेर काढून बळ द्यायचे आहे, असेही जोशी यांनी स्पष्ट केले होते. तसेच, नान्नज येथे ग्रोथ सेंटर (छोटी औद्योगिक वसाहत) मंजूर केले होते. पण ते सेंटर पुढे बारगळले.

शिरापूर उपसा सिंचन योजनेतून शिरापूर येथील सीना नदीपासून कालवा काढण्यात येणार हेाता. त्याला उजवा आणि डावा कालवे काढून वितरिकेच्या माध्यमातून पाणी सोडण्यात येणार होते. योजनेच्या माध्यमातून उत्तर सोलापूर आणि मोहोळ तालुक्यातील ३३०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणे अपेक्षित होते. मात्र, या योजनेचे श्रेय शिवसेनेला मिळेल, यामुळे पुढच्या काँग्रेस सरकारने या योजनेला निधी दिला नाही. मात्र, युती सरकारने दिलेल्या निधीतून तालुक्यात कालव्याची काही कामे झाली आहेत, त्यातून सध्या पाणी सोडले जाते.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT