Abhijeet Patil-Devendra Fadnavis Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vitthal Sugar Factory : अभिजित पाटलांना दिलासा; ‘विठ्ठल’वरील कारवाई मागे, पाच तारखेपर्यंत गोदामे ताब्यात मिळणार

Vijaykumar Dudhale

Solapur, 3 May : माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करताच दुसऱ्याच दिवशी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील जप्तीच्या कारवाईत अध्यक्ष अभिजित पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे. थकीत कर्जाप्रकरणी सुनावणी सुरू असताना राज्य सहकारी बॅंकेने केलेली कारवाई ही अनाधिकृत आणि लहरीपणाची आहे, असे ताशेरे पुण्यातील कर्ज वसुली लवादाने या प्रकरणावर ओढत येत्या पाच तारखेपर्यंत विठ्ठल साखर कारखान्याची गोदामे सीलमुक्त करण्यात यावीत, असे आदेश राज्य सहकारी बॅंकेला दिले आहेत.

राज्य सहकारी बॅंकेने (State Cooperative Bank शिखर बॅंक) 430 कोटी रुपयांच्या कर्जवसुली प्रकरणी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची (Vitthal Cooperative Sugar Factory) तीन गोदामे सील केली होती. तसेच, साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई केली हेाती. या कारवाईमुळे कारखान्याची जवळपास 1 लाख साखर पोती अडकून पडली होती. बॅंकेने ही कारवाई 26 एप्रिल रोजी केली होती. त्यानंतर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील (Abhijeet Patil)यांनी तातडीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची सोलापूरमध्ये भेट घेतली होती. त्या भेटीत तुम्ही लोकसभेला आम्हाला मदत करा; आम्ही तुम्हाला कारखान्यात मदत करतो, असा शब्द फडणवीस यांनी दिल्याचे अभिजित पाटील यांनी सांगितले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, शिखर बॅंकेने केलेल्या कारवाईच्या विरोधात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील हे पुण्यातील कर्जवसुली लवादात गेले होते. त्या ठिकाणी गुरुवारी (ता. 2 मे) सुनावणी झाली. त्या सुनावणीत शिखर बॅंकेच्या वतीने विठ्ठल कारखान्याचा अर्ज फेटाळण्यात यावा. कारखान्याकडे मोठी थकबाकी असून ती बॅंकेला परत करावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्याचवेळी कारखान्याकडूनही आपली बाजू मांडण्यात आली.

विठ्ठल कारखान्याच्या थकबाकीचा वाद हा न्यायप्रविष्ठ आहे. बॅंकेच्या वतीले मागील तारखेच्या सुनावणीत कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले होते. त्यानंतरही शिखर बॅंकेकडून विठ्ठल सहकार साखर कारखान्याची तीन गोदामे सील करण्यात आली. हे अनाधिकृत आणि लहरीपणाचे आहे, असा शेरा नोंदवत येत्या पाच मेपर्यंत गोदामे सीलमुक्त करून ती कारखान्याकडे पुन्हा सोपवण्यात यावीत, असे निर्देश लवादाने दिले आहेत.

दरम्यान, या सर्व घडामोडीत अभिजित पाटील यांनी आपली राजकीय निष्ठा बदलत भाजपच्या उमेदवाराला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेले पाटील यांनी भाजपचे माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांना समर्थन जाहीर केले आहे.

राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतली, त्यामुळे कर्ज वसुली लवादाने गोदामे सीलमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. गोदामे खुली झाल्याने उसाचे बिल शेतकऱ्यांना देण्याचा मार्ग खुला झाला आहे, असे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT