Prakash Ambedkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Prakash Ambedkar Sabha : राजकारणी, कारखानदारांवर छापे टाकून झाले, आता व्यापाऱ्यांचा नंबर; आंबेडकरांनी व्यक्त केली भीती

Vijaykumar Dudhale

Solapur, 2 May : मोदींच्या काळात तब्बल 17 लाख हिंदू कुटुंबांनी भारताचं नागरिकत्व सोडलं आणि परदेशात जाऊन स्थायिक झाले आहेत. त्यांच्याकडे केलेल्या मागण्या पूर्ण करता येत नाही, त्यामुळे त्यांना धमकावलं जातं होतं, त्यातूनच त्यांनी देश सोडण्याचा निर्णय घेतला, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.

धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे (Dharashiv Lok Sabha Constituency) लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांच्या प्रचारार्थ बार्शीत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारवर (Modi Government) गंभीर आरोप केला. ते म्हणाले, एक अत्यंत महत्वाची माहिती केंद्र सरकारने दडवली आहे आणि काँग्रेसवाले त्यावर बोलायला तयार नाहीत. राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर दिलं आहे. एकंदरित 17 लाख कुटुंबांनी भारताचं नागरिकत्व सोडलं आणि परदेशी जाऊन स्थायिक झाले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ही जी 17 लाख कुटुंबं होती, त्यांची प्रत्येकाची मालमत्ता कमीत कमी 50 कोटींची होती. हे आकडे माझे नाहीत. राज्यसभेच्या वेबसाईटवर तुम्हाला हे आकडे मिळतील. त्यांच्यापैकी काहींना विचारलं की, तुम्ही देश सोडून बाहेर का जात आहात. ते म्हणत होते की, आम्ही ही जी पन्नास कोटींची मालमत्ता कमावली आहे, ती आमच्या बापजाद्यांनी घाम गाळून, मेहनत करून लोकांचा विश्वास संपादन करून त्यावर आमची ही पुंजी मिळविलेली आहे, असा दावा ही आंबेडकर यांनी केला.

ते पुढे म्हणाले, आमच्याकडे मागण्या केल्या जातात. त्या मागण्या आम्हाला पूर्ण करता येत नाहीत; म्हणून आम्हाला धमकावलं जातंय. आम्ही असं ठरवलंय की आपल्या बापजाद्यांनी कमावलेली इज्जत मातीत मिळविण्यापेक्षा आम्ही भारत सोडून परदेशी जाण्याचा निर्णय घेतला आहे. नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला (BJP) यासाठीच तुम्ही सत्तेमध्ये बसवलं होतं का? की १७ लाख हिंदू कुटुंबांनी देश सोडून जावा. मला विचारलं जातं की 1950 पासून 2014 पर्यंत किती लोकं देशाबाहेर गेले, तर फक्त सात हजार गेले. त्यांचे वय 60 च्या आसपास होतं. जे गेले ते आपल्या मुलांकडे किंवा मुलींकडे आयुष्य साधण्यासाठी गेले ओत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) लोक कोणत्या तोंडाने आता मोदींसाठी मतदान मागणार आहात. हे वसुलीचे राज्य आहे. बार्शीतील व्यापाऱ्यांना सांगतो की राजकारणी, कारखानदारांवर आतापर्यंत छापे टाकून झाले आहेत. आता तुमचा नंबर आहे. तुम्ही भाजपला भले डोनेशन द्या; पण मत देऊ नका. तुम्ही भाजपला मत दिलं की तुमचा नंबर लागणार आहे, हे लक्षात ठेवा, अशा शब्दांत बार्शीच्या व्यापाऱ्यांना त्यांनी इशारा दिला.

मोदींना फक्त जुलमेबाजी करायची आहे. लोकांना फसवायचं आहे. मोदी सरकारच्या काळात कर्जाचे प्रमाण वाढत चाललं आहे. दारुड्याची वृत्ती आणि मोदी यांची वृत्ती एकच आहे. पूर्वजांचे सोन, जमीन जुमला आपण विकत नाही. त्यांच्याशी आर्थिक, भावनिक आणि शाश्वत नातं असतं. उद्याच्या संकटकाळात मी हे वापरू शकतो, असा तो विश्वास आहे. या नवरत्न कंपन्या देशाचा आत्मा आहेत. हा आत्मा शरीरातून काढला जीव राहत नाही. पुढची पाच वर्षे मोदींना दिली, तर ते देशाला कंगाल करतील, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT