मोहोळ मतदारसंघात अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असून आमदार राजू खरे यांच्या गैरहजेरीवर विरोधकांनी टीका केली.
खरे यांनी सांगितले की ते मुंबईत जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना परिस्थितीची माहिती दिली असून गृहराज्य मंत्री योगेश कदम यांना पाहणीसाठी बोलावले आहे.
त्यांनी शेतकऱ्यांना पंचनामे व नुकसानभरपाईबाबत आश्वस्त करत भ्रष्टाचाराच्या तक्रारीसाठी थेट संपर्क साधण्याचे आवाहन केले.
Solapur, 21 September : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघात अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. वारंवार होणाऱ्या पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार राजू खरे हे गायब होते, त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात होती. मात्र, गेली तीन दिवस आपण मुंबईत होतो, एकनाथ शिंदेंना मतदारसंघातील संपूर्ण माहिती समजावून सांगितली असून मंत्री योगेश कदम यांना पाहणीसाठी उद्या मोहोळच्या दौऱ्यावर पाठविले आहे, असेही सांगितले.
आमदार राजू खरे (Raju Khare) यांनी रविवारी (ता. 21 सप्टेंबर) मोहोळ तालुक्यातील शिंगोली, तरटगाव, आष्टे, नंदगाव, हिंगणी, मलिकपेठ यांसह अन्य गावांतील बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीची बांधावर जाऊन पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांना धीर देत गृहराज्य मंत्री योगेश कदम हे उद्या पाहणी दौऱ्यासाठी येत आहेत, असेही नमूद केले.
मी तीन दिवस मुंबईत होतो. अतिवृष्टीमुळे मतदारसंघातील शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीची वस्तुस्थिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितली. त्याची दहाकता पाहण्यासाठी आपण मंत्रिमंडळातील मंत्र्यांना मोहोळच्या (Mohol) दौऱ्यावर पाठवावे, अशी विनंती केली. ती मागणी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ती मान्य करत महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांना मोहोळच्या दौऱ्यावर पाठविण्याचे आश्वासन दिले आहे, असेही खरे यांनी स्पष्ट केले.
मोहोळ मतदारसंघातील एक शेतकरी पंचनाम्यापासून व नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही. अतिवृष्टीमुळे मोहोळ तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गृहराज्य मंत्री योगेश कदम हे उद्या (सोमवारी, ता. 22 सप्टेंबर) खास मोहोळच्या दौऱ्यावर येत आहेत, असेही त्यांनी नमूद केले आहे.
पंचनाम्याच्या प्रक्रियेत असणारे काही कर्मचारी शेतकऱ्यांना पैसे मागतात, अशी चर्चा होती, त्यावर आमदार खरे म्हणाले, असा प्रकार कुठे असेल तर थेट माझ्याशी संपर्क करा, मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे याबाबत तक्रार करेन, असेही राजू खरे यांनी सुनावले
आमदार राजू खरे हे नुकसानीच्या पाहणीसाठी उशिरा शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्याची टीका विरोधकांकडून समाज माध्यमांवर होत आहे. त्याला आमदार खरे यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, गेली 40 वर्षे विरोधकांकडे सत्ता होती, त्यांनी काय दिवे लावले, हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळेच त्यांच्या कारभाराला कंटाळून मतदारांनी मला निवडून दिले, त्यामुळे मी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे.
प्र: मोहोळ मतदारसंघात नुकसानीचे मुख्य कारण काय आहे?
उ: सततच्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
प्र: आमदार राजू खरे यांच्यावर कोणती टीका झाली?
उ: अतिवृष्टीच्या काळात ते मतदारसंघात अनुपस्थित असल्याची टीका झाली.
प्र: पाहणीसाठी कोणते मंत्री येणार आहेत?
उ: गृहराज्य मंत्री योगेश कदम मोहोळच्या दौऱ्यावर येणार आहेत.
प्र: शेतकऱ्यांच्या तक्रारींवर खरे यांची भूमिका काय आहे?
उ: भ्रष्टाचाराची कोणतीही घटना आढळल्यास थेट तक्रार करण्याचे त्यांनी आवाहन केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.