Solapur, 29 May : वाळूमाफियांना रोखण्यासाठी नवीन वाळू धोरण आम्ही आणलं आहे. अनेकांचे मंत्र्यांशी संबंध असतात. वाळूसंदर्भात तर काही जण अधिकाऱ्यांना माझंदेखील नावं सांगतात. पण, माझा जरी फोन आला तरी चुकीच्या कामाला ‘नाही म्हणा,’ अशा सूचना मी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पुढच्या तीन वर्षांत वाळू माफिया आणि वाळू संदर्भातले सर्व महत्वाचे प्रश्न संपलेले असतील, असा दावा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. त्या वेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी वाळू धोरणासंदर्भात भाष्य केले. ते म्हणाले, वाळू माफिया अधिकारी आणि पोलिसांना माहिती होत नाहीत, असं होऊच शकत नाही, त्याबाबत दखल घेतली जाईल. राज्यासाठी नवीन वाळू धोरण आणत आहोत. राज्यातील 20 लाख घरांना मोफत वाळू द्यायची आहे. उजनी धरणाचे खोलीकरण करून त्यातून निघणारी वाळू सरकारी कामांना देण्याची चर्चा झाली आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भूमी अभिलेख खात्यातील कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर रुजू होण्यासाठी सूचना दिल्या आहेत. ते शासनाला कोणताही सूचना न देता संपवार गेले आहेत. त्यांच्या कोणत्या मागण्या आहेत, हे त्यांनी ड्यूटीवर येऊन सांगावे. लोकांना वेठीस धरणे हे शासन कदापि मान्य करणार नाही. आम्ही त्यांची कोणतीही मागणी अशी पूर्ण करणार नाही, त्यांना पगार देखील दिला जाणार नाही. अशा पद्धतीने कोणतीही गोष्ट न सांगता जरं आंदोलन आणि युनियनबाजी करणार असतील, तर हे मान्य नाही, असा इशारा बावनकुळे यांनी भूमी अभिलेखच्या कर्मचाऱ्यांना दिला.
तुमचा कुठलाही प्रश्न असेल तर सरकारपुढे मांडा. मंगळवारी येऊन मला भेटा, पण यापद्धतीने लोकांना वेठीस धरणे योग्य नाही. सरकार तुमचा प्रश्न सोडवायला तयार आहे, कोतवालपासून तलाठीपर्यंत सर्वांना न्याय दिला जाईल, असेही महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे अधिकार हे आयोगाला आहेत. आयोग जेव्हा निवडणूक घेईल, तेव्हा सरकार म्हणून यंत्रणा तयार आहे. भाजप म्हणून देखील आम्ही सक्षमपणे तयार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही महायुतीमध्येच लढविणार आहोत. ज्याठिकाणी जुळणार नाही, त्याठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल, त्यानंतर पुन्हा एकत्रित येऊ. महायुतीमध्ये प्रॉब्लेम आहे, असं काही याचा अर्थ नाही.
भाजप निवडणुकीत जिंकतो, त्यातून काही शिकतो. लोकसभेत काही जागांवर आम्ही शिकलो आणि चार महिन्यांत आम्ही विधानसभा निवडणुकीत जिंकलो. जिंकणे हरणे या लढाईत न जाता आम्ही राज्यातील जनतेच्या कामाला लागलोय, असेही भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी सांगितले.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी किती वेडे झालेत, हे संपूर्ण देशाला माहिती आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ सारख्या गोष्टीवर ते प्रश्नचिन्ह उभे करतात. महाराष्ट्रमध्ये सावरकर यांच्या अपमान त्यांनी केला, त्यावेळी कोर्टानं त्यांना फटकारलं होतं. ते वेडे झालेत, त्यामुळे त्यांच्या नादाला तुम्ही लागू नका, असा सल्लाही त्यांनी माध्यम प्रतिनिधींना दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.