Rahul Gaikwad Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur 'Vanchit' News : माझ्या हातात बंदूक दिली, पण गोळ्या दिल्या नाहीत; सोलापूरमधील ‘वंचित’च्या उमेदवाराचा गंभीर आरोप

Vijaykumar Dudhale

Solapur, 22 April : मी सोलापूरच्या मैदानात लढण्यासाठी उतरलो होतो. पण, माझा गेल्या 15 दिवसांचा अनुभव पाहता मला असं वाटतंय की मला लढण्यासाठी मैदानात सोडलं तर आहे, माझ्या हातात बंदूक दिली आहे. पण, त्यासाठी लागणाऱ्या गोळ्या मला दिलेल्या नाहीत, असा गंभीर आरोप सोलापूर लोकसभा मतदारसंघातून माघार घेणारे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी केला.

वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Ahgadi) उमेदवार राहुल गायकवाड (Rahul Gaikwad) यांनी आज सोलापूर लोकसभा मतदारसंघातून (Solapur Lok Sabha Constituency) उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, मला सोलापूरच्या मैदानात लढण्यासाठी सोडलं. मला बंदूकही दिली, पण त्यासाठी लागणाऱ्या गोळ्या दिल्या नाहीत. मला छऱ्हे दिले आहेत, जेणेकरून मी हे युद्ध लढवेन पण पार पाडता येणार नाही, असं चित्र माझ्यासमोर उभं राहत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लढणं हा एक भाग झाला. हार जीत हा पुढचा भाग झाला. पण, जे सैनिक थाऱ्यावर नाहीत, अशा सैनिकांना घेऊन लढणं, यातून अपेक्षित यश मिळणं शक्य होत नाही. सोलापूरमध्ये अर्धवट लढण्याचाच प्रकार वाटत होता. अर्धवट लढण्यामुळे भाजप नेत्याला आपण वाट मोकळी करतोय, त्यांना सोयीचं करतोय, याची मला काळजी वाटत होती. माझ्यामुळे भाजपचा एक नेता संसदेत जाईल आणि संविधानाला धोका होईल, असं कोणतंही काम मला करायचं नव्हतं, असंही राहुल गायकवाड यांनी स्पष्ट केले.

गायकवाड म्हणाले, मी सोलापूरमध्ये काँग्रेस आणि भाजप या दोघांना हरवायला आलो होतो. पण सध्याची परिस्थिती बघता मी या दोघांना हरवायला नाही, तर भाजप निवडून येईल असं वाटतं होतं. त्याचं कारण मला बनायचं नव्हतं. त्यामुळे मीच निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. संविधानाला वाचविण्यासाठी मी माघारीचा निर्णय घेतला आहे. संविधानाला धोका होईल, असा एकही माणूस मला संसदेत पाठवायचा नाही.

चळवळ अशी उभा राहत नाही, येथील आंबेडकरी जनता निरागस आहे. चळवळीसाठी निरागस नेते तयार झाले पाहिजेत, तरच निरागस चळवळ उभी राहील. चळवळीत काही चांगलं लोक आहेत. पण या मोजक्या लोकांना सोडून येथे मला प्रत्येकजण ब्रोकर दिसला आहे. प्रत्येक जण स्वतःचा स्वार्थ घेऊन आलेला आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सोलापुरात चळवळीच्या नावाखाली पोकळ फळी

आंबेडकरी चळवळ माझ्या डीएनएमध्ये आहे. मात्र, मी पंधरा दिवसांत सोलापूरमध्ये जे अनुभवलं आहे, ते चळवळ नव्हे. हे माझ्या लक्षात आलं आहे. इथल्या भोळ्या भाबड्या जनतेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आदर आहे. चळवळीच्या नावाखाली जी फळी आहे, ती पूर्णपणे पोकळ आहे. ती चळवळीला पोषक नाही. चळवळीला पोषक नसणारी ताकद ही उलट्या दिशेने जाऊ शकते. या कार्यकर्त्यांच्या फळीचा आंबेडकरांच्या नावाखाली आजही तितकाच घट्ट स्वार्थ आहे. तिकडं मला कुठेही बाबासाहेब आणि त्यांचे स्वप्न दिसत नाही.

  • R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT