Raju Shetti, Dhairyashil Mane sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Loksabha Election 2024 : जातीय समीकरणाचा आणि निष्ठावंतांचा फटका स्वाभिमानीला घातक...

Rahul Gadkar

Hatkanangale News : इचलकरंजी लोकसभा मतदारसंघापासून तयार झालेला हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा सुरुवातीपासूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जात होता. मात्र, 2009 नंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने त्याला सुरुंग लावला. तब्बल दहा वर्षे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हा लोकसभा मतदारसंघ आपल्या बाजूने ठेवला. माजी खासदार निवेदिता माने यांचे पुत्र धैर्यशील माने यांनी शिवसेनेत प्रवेश करून 2019 च्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानीकडून गड हिरावून घेतला.

विधानसभा निवडणुकीचा विचार केल्यास हातकणंगले मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. गेल्या काही निवडणुकीपासून समीकरणे बदलली. २००४ च्या निवडणुकीत जनसुराज्यने बाजी मारली, तर २००९ व २०१४ मध्ये शिवसेनेने विजय मिळवला. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस विजयी झाली. मात्र, गेल्या दोन निवडणुकांच्या निकालांत शेतकरी संघटनेची भूमिका निर्णायक ठरली.

माजी खासदार राजू शेट्टींच्या विरोधात कोण? ही चर्चाही रंगली आहे. मात्र, उमेदवार निश्चित झाल्यानंतरच निकालाची गणिते ठरणार असून, जातीय समीकरणेही निर्णायक ठरणार आहेत. या लोकसभा मतदारसंघात जैनधर्मीय लोकांची संख्या अधिक आहे. त्याचबरोबर मराठा समाजाची संख्या ही तितकीच लक्षणीय आहे. दुरंगी लढत झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि महायुती दोघेही समान अंतरावर असतील. जर शेट्टी यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळाला तर महायुतीला या ठिकाणी अडचण होऊ शकते.

या विधानसभा मतदारसंघात काँग्रेस- राष्ट्रवादीबरोबरच शिवसेनेचीही (ठाकरे गट) स्वतंत्र ताकद आहे. शेतकरी संघटनेची मोठी ताकद या मतदारसंघात आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात जातीय समीकरणांचा प्रभाव जाणवला. त्यावेळी धैर्यशील माने यांचा विजय व शेट्टी यांचा पराभव झाला असला, तरीही वंचितची ४२ हजार ३२५ मते विचार करायला लावणारी ठरली. सध्या महायुतीतून माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांचेही नाव चर्चेत आहे, तर ठाकरेंचा पाठिंबा मिळविण्यासाठी शेट्टींचे प्रयत्‍न सुरू आहेत.

महायुतीकडूनही येथे नवा चेहरा दिला जाण्याचीही शक्यता आहे. त्यादृष्टीने राहुल आवाडे व शौमिका महाडिक यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. मतदारसंघात प्रकाश आवाडे, राजूबाबा आवळे, अमल महाडिक, विनय कोरे यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. हातकणंगले लोकसभा निवडणूक दुरंगी होणारी की तिरंगी याबाबतची उत्सुकता वाढत चालली आहे. राजू शेट्टी आणि धैर्यशील माने या दोघांत दुरंगी लढत झाली, तर दोघांनाही समान संधी असल्याचे चित्र आजतरी आहे.

मात्र, तिरंगी लढत झालीच, तर मग तिसरा उमेदवार कोण? आणि महाविकास आघाडीने तिसरा उमेदवार दिलाच, तर राजू शेट्टी यांची भूमिका ‘एकला चलो रे’ची राहणार का आणि तिरंगी लढतीचा फटका शेट्टी यांना बसण्याची शक्यता आहे. आमदार विनय कोरी यांची दूध संस्थेच्या माध्यमातून आणि कुटुंब जोडली गेली आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवाय माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा हातकणंगले तालुका म्हणजे एक प्रकारे बालेकिल्लाचं आहे, तर विद्यमान खासदार धैर्यशील माने यांचे मूळ गाव याच विधानसभा मतदारसंघात येते. दुरंगी लढत झाल्यात समान अंतरावर दोन्हीही गट असतील. पण तिरंगी लढत झाल्यास शिवसेनेचा निष्ठावंत विभागला जाईल. त्याचा फटका स्वाभिमानी शेतकरी संघटनेला बसेलच शिवाय महायुतीला इथून ताकद मिळेल असा अंदाज आहे.

Edited By : Umesh Bambare

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT