Dhairyasheel Mane sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Hatkanangle Lok Sabha Constituency: धैर्यशील माने यांचा डबलधमाका वाजणार का? ठाकरे गटाचे आव्हान पेलणे कठीण

Rahul Gadkar

Lok Sabha Election 2024  : प्रचंड जनाधार असणाऱ्या आणि हॅट्रिकची संधी असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना अस्मान दाखवून राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात खासदार धैर्यशील माने यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत युतीचा झेंडा फडकवला. आजोबा बाळासाहेब माने आणि आई निवेदिता माने यांच्याकडून राजकारणाचे बाळकडू मिळाल्यानंतर धैर्यशील माने यांनी ग्रामपंचायत स्तरापासून कामाला सुरुवात केली.

आपल्या वक्तृत्वाने तरुणांना भुरळ घालणारा नेता म्हणून खासदार धैर्यशील माने यांच्याकडे पहिले जाते. शिवसेनेतून विजयी झाल्यानंतर 'मातोश्री'चा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहिला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माने यांचे वक्तृत्व पाहुण त्यांना शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून जाहीर केले. पण शिवसेनेत फूट पडल्यानंतर माने यांनी शिंदे गटाचा पर्याय शोधला. सध्याचा काळ पाहता धैर्यशील माने यांची उमेदवारी युतीकडून निश्चित मानले जाते. मात्र जनाधार पाहता त्यांची उमेदवारी ही युतीला अडचणीत आणण्याची बाब ठरू शकते.(Latest Marathi News)

नाव (Name)

धैर्यशील संभाजीराव माने

जन्मतारीख (Birth date)

23 डिसेंबर 1981

शिक्षण (Education)

बीए

नोकरी किंवा व्यवसाय काय? (Service/Business)

शिक्षण संस्था, शेती आणि टेक्स्टटाईल्स

लोकसभा मतदारसंघ कोणता? (Lok Sabha Constituency)-

हातकणंगले

राजकीय पक्ष कोणता? (Political Party Affiliation) -

शिवसेना (शिंदे गट)

कौटुंबिक पार्श्वभूमी (Family Background)

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पाचवेळा इचलकरंजी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले बाळासाहेब माने यांचे धैर्यशील माने हे नातू आहेत. रुकडी गावाचे सरपंच ते लोकसभा सदस्य असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. धैर्यशील माने हे लहानपणापासून आजोबांच्या तालमीत तयार झाले.राजकारणाचे बाळकडू घरातूनच त्यांना मिळाले.

बाळासाहेब माने यांच्या निधनानंतर त्यांच्या सून व खासदार धैर्यशील माने यांच्या मातोश्री निवेदिता माने यांनी त्यांच्या राजकारणाचा वारसा पुढे चालवला. सुरुवातीला अपक्ष आणि शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवली. मात्र, त्यांना यश मिळाले नाही. 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवेदिता माने लोकसभेवर निवडून गेल्या. 2004 लाही त्यांनी बाजी मारली. धैर्यशील माने यांच्या मातोश्रीच निवडणुकीत उमेदवार असल्याने त्यांच्या प्रचाराची धुरा माने यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. त्या माध्यमातून त्यांनी गावागावात कार्यकर्त्यांची फळी उभी केली.

आतापर्यंत कोणकोणत्या निवडणुका लढविल्या? किंवा आतापर्यंतचा राजकीय प्रवास? (Election Contested or Political Journey)

2002 मध्ये त्यांनी रुकडी ग्रामपंचायतमध्ये विजय मिळवला. ग्रामपंचायतीमध्ये काम करत असतानाच 2007 ला शिरोळ तालुक्यातील आलास गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवून यश संपादन केले. या कालावधीत अडीच वर्षे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून अतिशय नेटाने काम केले. त्यानंतर 2012 ला हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली गटातून ते दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेत पोहोचले; पण येथे काँग्रेस-राष्ट्रवादीला बाजूला करत सत्ता स्थापन केल्याने माने यांच्यावर विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी पडली. ही जबाबदारीही अतिशय प्रभावीपणे पार पाडत जिल्हा परिषदेचे सभागृह पाच वर्षे गाजवले.

त्यांची आक्रमक वक्तृत्वशैली, अभ्यासू मांडणीमुळे सत्ताधाऱ्यांना धडकी भरायची. जिल्हा परिषदेची ही टर्म संपल्यानंतर पत्नी वेदांतिकांना रूकडी जिल्हा परिषद मतदारसंघातून रिंगणात उतरवले; पण त्यांचा पराभव झाला. हा पराभव माने गटाच्या जिव्हारी लागणारा होता. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या मातोश्री निवेदिता माने यांचा राजू शेट्टी यांच्याकडून पराभूत झाल्या. 2009 ते 2019 हा काळ माने गटासाठी आव्हानात्मक होता.राष्ट्रवादीत होणाऱ्या कुचंबणेमुळे तेही अस्वस्थ होते. त्यातून नाराज होत त्यांनी नोव्हेंबर 2018 मध्ये हातात शिवबंधन बांधले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना हातकणंगले मतदारसंघातून उमेदवारी दिली.

राजू शेट्टी यांच्या सारखे तगडे आव्हान असताना धैर्यशील माने यांनी या निवडणुकीत विजय मिळवला. राजू शेट्टी यांचा 93 हजार 785 मतांनी पराभव करत त्यांनी लोकसभेत प्रवेश केला. युतीशी फारकत घेऊन उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अडीच वर्षांने एकनाथ शिंदे यांनी बंड केले. खासदार माने यांनी शिंदे गटाचा पर्याय स्वीकाराला. धैर्यशील माने यांनी निवडणूक जिंकल्यानंतर थेट राजू शेट्टी यांचे घर गाठून त्यांच्या आईचा आशीर्वाद घेतला होता. राजकारणातील या नव्या कोल्हापुरी पॅटर्नची त्यावेळी चांगलीच चर्चा रंगली होती. काहीच ठोस काम झाले नसल्याने मतदारसंघातील कोरे-आवाडे-महाडिक-हाळवणवकर गटाचा फायदा आपल्याला 2024 मध्ये होईल, या अंदाजाने ते शिंदे गटात गेल्याची चर्चा आहे.  

2019 मधील निवडणूक लढविली होती का? त्याचा निकाल काय लागला? (Whether Contested 2019 Lok Sabha Election)

2019 च्या निवडणुकीत ते विजयी झाले.

2019 मधील निवडणूक निकालात विजय मिळाला असल्यास त्याची कारणे काय होती? पराभव झाला असल्यास त्याची कारणे काय होती? (Reasons for Winning the Election or Losing the Election)

या विजयात मराठा कार्ड हा महत्त्वाचा मानला जात होता. शिवाय मागील दहा वर्षांत लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टी यांच्याबद्दल नाराजी वाढली होती. शिवाय 2009 च्या निवडणुकीत शेट्टी यांनी भाजपची मदत घेतली होती. मात्र 2014 च्या निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवली. त्यामुळे त्यांच्यावर नाराज झालेले शिवसेना आणि युतीचे कार्यकर्ते हे धैर्यशील माने यांच्या मागे उभे राहिले. शिवाय युवा नेतृत्व म्हणून धैर्यशील माने यांच्याकडे सामान्य नागरिक पाहू लागला.

मतदारसंघातील जनसंपर्क कसा आहे? (Public Relation in Constituency)

खासदार धैर्यशील माने हे लोकसभा सदस्य झाल्यापासून मतदारसंघात त्यांचा संपर्क थंडावलेला आहे. पेटवडगाव आणि आष्टा भागात खासदार गायब असल्याचे फलकही झळकले होते.मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून त्यांनी आपल्या मतदारसंघात विविध विकासकामांचे उद्घाटन करत संपर्क कायम ठेवला आहे.

सोशल मीडियावरील प्रसिद्धीबद्दल? (Social Media Handles)-

खासदार धैर्यशील माने यांची सोशल मीडियात प्रसिद्धी फार कमी असल्याचे दिसून येते. फेसबुक, इंस्टाग्राम या समाज माध्यमांतून त्यांच्या विकासाची कामे सर्व दूर पोहोचलीत असे नाही. सध्या तरी त्यांच्या समाजमाध्यम अकाउंटवरून राजकीय दौरे यासह विकासकामांच्या उदघाटनांचेी माहिती दिली जाते.

उमेदवाराने केलेली महत्त्वाची राजकीय विधाने किंवा वक्तव्ये (Political Statements made by Candidate)

नाही

राजकीय गुरु कोण? (Political Godfather/Guru)

मातोश्री निवेदिता माने, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सकारात्मक मुद्दे (Positive Points about candidate)

2019 ला लोकसभा सदस्य झाल्यापासून ते आतापर्यंत हातकणंगले लोकसभा मतदारसंघात 8200 कोटी रुपयांची विकासकामे मंजूर केल्याचा दावा ते करतात. शिवाय शाहूवाडी व आष्टा येथे नवीन एमआयडीसी स्थापन करण्यास त्यांनी तत्वतः मंजुरी आणली आहे. शिवाय नागपूर -रत्नागिरी रोडसंदर्भात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून जाणाऱ्या रोडसाठी त्यांनी शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. जवळपास 7000 कोटी रुपयांचा महामार्ग व्हावा, यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

नकारात्मक मुद्दे (Negative Points about candidate)

माने कुटुंबियांच्या पडत्या काळात शिवसेनेने मोठा आधार दिला होता. शिवसेनेत फूट पडल्यानंतर धैर्यशील माने यांनी शिंदे गटात जाण्याचा पर्याय निवडला. त्यामुळे हातकलंगले लोकसभा मतदारसंघातील जनता प्रचंड नाराज आहे. मागील लोकसभा निवडणूक काळात माने यांना ज्यांनी पाठिंबा दिला ते देखील आता यांच्यावर नाराज असल्याची माहिती आहे. धैर्यशील माने यांना 'मातोश्री'वर सहज प्रवेश मिळाला होता. मूळचे शिवसैनिक नसतानाही पक्षाकडून उचित सन्मान राखला गेला. असे असूनही धैर्यशील माने यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय का घेतला? याचीच चर्चा मतदारसंघात रंगली आहे. सध्याच्या घडीला त्यांना उमेदवारी मिळाल्यास युतीमधील काही मित्र पक्ष नाराज होण्याची शक्यता आहे.

उमेदवारी न मिळाल्यास काय होऊ शकते (If didn’t get chance to contest Lok Sabha election what will be the consequences)

धैर्यशील माने यांना उमेदवारी न मिळाल्यास केवळ माने गटच नाराज होऊ शकतो.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT