Solapur, 13 March : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने घेतलेल्या पहिल्याच बैठकीत माजी आमदार संजय शिंदे यांनी पुन्हा एकदा शड्डू ठोकला. माढा तालुक्यातील 36 गावं पुन्हा माढ्याला जोडली गेल्यानंतर मी करमाळ्यात येणार नाही, असं बोललं गेल. पण ‘माझी जन्मभूमी माढा असली, तरी माझी आयुष्यभराची कर्मभूमी ही करमाळा असणार आहे आणि मी लय दमदार आहे,’ असे सांगून आपण करमाळा सोडून कुठेही जाणार नसल्याचे संजय शिंदे यांनी स्पष्ट केले.
करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी आमदार संजय शिंदे (Sanjay Shinde) यांनी कार्यकर्त्यांची विचार विनिमय बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत बोलताना विधानसभा निवडणुकीतील पराभव, कारखाना निवडणुकीच्या रणनीती आणि पुढील राजकीय वाटचाल यावर शिंदे यांनी भाष्य केले.
ते म्हणाले, निवडणुकीत (Election) जय पराजय चालूच असतो. तो काय मला नवीन नाही. जिल्हा परिषद, लोकसभा, विधानसभा, जिल्हा बॅंक आदींच्या निवडणुकीचा अनुभव पाठीशी आहे. पण, पराभवाच्या ब्रेकनंतर आपल्याला एक चांगली संधी निर्माण होते. चार पावले पुढे जाण्यासाठी हा वेळ महत्वाचा ठरतो. आपल्या चुका लक्षात येतात. वाहत्या गंगेत सगळेच हात धुतात. पदावर असताना लोक ओळखायला येत नाहीत. पण, आपण अडचणीत असतो, त्या वेळी त्या माणसाची परीक्षा असते, त्यामुळे माणसाला राजकारणातसुद्धा ब्रेक मिळालाच पाहिजे.
आपण सर्व डोळे झाकूनच सर्व करायला गेलो, तर आपण कुठे आहोत, हे आपल्यालाच कळत नाही. विधानसभा निवडणुकीत अनपेक्षित घटना घडत केल्या, त्याचा उहापोह आता करत बसायची गरज नाही. जे झालं ते झालं. आपण कुठेही कमी पडलो नाही, कोणताही पक्ष बरोबर नसताना, कुठलंही तिकिट नसताना मागच्या निवडणुकीपेक्षा आपण चार मतं जास्तीचीच मिळविली आहेत. अपक्ष म्हणून आपण 80 हजारांपेक्षा अधिक मतं घेतली आहे, असेही संजय शिंदे यांनी स्पष्ट केले.
माजी आमदार शिंदे म्हणाले, राजकारणात मी तीस वर्षे काम करताना मी जिथं जातो, मतं घेतो, त्या लोकांच्या उपकराची जाणीव आयुष्यभर ठेवतो. आपल्याकडे गप्पा भरपूर मारतात, कुणी म्हटलं, आता माढा तालुक्यातील 36 गावं तुटायची आहेत, त्यामुळे आता मी करमाळ्यात येणार नाही. पण, अजिबात काळजी करू नका. माझी जन्मभूमी माढा असली तरी माझी आयुष्यभराची कर्मभूमी ही करमाळाच असणार आहे. मी लय दमदार आहे.
माढा तालुक्यातील 36 गावे तुटली तरी तुम्ही अजिबात काळजी करू नका. माझी कर्मभूमी आयुष्यभरासाठी करमाळाच ठेवणार आहे, त्यामुळे थोडक्यासाठी कोणी सुखाच्या झोपी काढत बसू नका. क्षणिक समाधानासाठी कोणी आनंद मानून घेऊ नये, असा टोलाही संजय शिंदे यांनी आपल्या विरोधकांना लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.