Patangrao Kadam-Jayant Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jayant Patil News : ‘ए...जयंत कळत नाही का?’ : जयंतरावांनी सांगितला पतंगराव कदमांचा किस्सा

Vijaykumar Dudhale

Sangli News : विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात आम्ही होतो. त्यावेळी मंत्रिमंडळ बैठकीत काय बोलायचं, हे सांगली जिल्ह्यातील आम्हा मंत्र्यांचं ठरायचं. एकदा असं सगळं ठरलं आणि मला बोलायला जरा वेळ लागला. शेजारच्या मंत्र्यांशी मी बोलत होतो. तेवढ्यात ‘ए....जयंत कळत नाही का?’ असे मला म्हणाले. मीही लगेच ‘हो हो साहेब’ म्हणालो. एवढ्या मोकळ्या मनाचा माणूस म्हणून पतंगराव कदम यांची ओळख होती. एवढ्या मोकळ्या मनाचा माणूस पुन्हा होणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पतंगराव कदम यांच्या आठवणींना उजाळा दिला. (Jayant Patil told the story of Patangrao Kadam)

पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार जयंत पाटील बोलत होते. त्यावेळी पाटील यांनी कदम यांच्या अनेक आठवणी सांगितल्या. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील अनेकांना पतंगराव कदम यांनी मदत केली. त्यांच्या कामात धडकपणा होता. पण सगळं करून आपल्या भागाला कधी विसरायचं नाही, हे त्यांच्याकडून मी शिकलो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात आम्ही होतो. पाणी योजना चालू करायच्या होत्या. तेव्हा पतंगराव कदम आम्हाला सांगायचे. ‘तू असं बोल, हे असं बोलतील. जयंत, तू अर्थमंत्री आहेस, तू लगेच हो म्हण. मुख्यमंत्री काही जास्त वेळ बोलणार नाहीत, तू जास्त वेळ लावू नकोस,’ असे मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी ठरायचं. एकदा असं सगळं ठरलं आणि मला बोलायला जरा वेळ लागला. कारण मी शेजारच्या मंत्र्यांशी बोलत होतो. तेवढ्यात ‘ए... जयंत कळत नाही का?’ असे ते मला म्हणाले. मीही लगेच हो, हो साहेब म्हणालो. एवढ्या मोकळ्या मनाचा माणूस म्हणून पतंगराव कदम यांची ओळख होती, असेही पाटील यांनी नमूद केले.

जयंत पाटील म्हणाले की, एकदा दुष्काळ पडला होता. ताकारी, टेंभू, म्हैसाळची कामे बंद पडली होती. अनुशेषाचा प्रश्न असल्यामुळे पैसे देता येत नव्हते. राज्यपालांकडे दोन-चार वेळा चकरा मारल्या. तत्कालीन राज्यपाल महंमद फजल हे सांगलीतील दुष्काळी भागाचा दौरा करायला तयार झाले. राज्यपाल, मी आणि पतंगराव कदम असे तिघेच हेलिकॉप्टरमध्ये होतो. तेवढ्यात राज्यपालांनी पायलटला थांबायला सांगितले. आम्हाला म्हणाले, ‘मी दौऱ्यावर येऊ शकत नाही.’ मी विचारले, ‘काय झालं, सर.’ त्यानंतर राज्यापालांनी खिशातील चिठ्ठी काढून मला वाचायला दिली.

विरोधी पक्षातील एका नेत्याने ती चिठ्ठी लिहिली होती. त्यांनी राज्यपालांना पत्र लिहिलं होतं. त्यात त्यांनी म्हटलं होतं की, ‘जयंत पाटील, पतंगराव कदम हे तुम्हाला दुष्काळी दौरा करायला नेत नाहीत, तर त्यांच्या योजनांना पैसा मिळविण्यासाठी तुम्हाला घेऊन जात आहेत. तुम्ही त्या दौऱ्यावर जाऊ नये, असं त्या पत्रात म्हटलं होतं, असा दावाही जयंत पाटील यांनी केला.

तेवढ्यात कदम म्हणाले, ‘हे बघ ह्यांनी केलाच घोटाळा.’ मी म्हटलं ‘साहेब, थांबा जरा. जरा गोड बोलून बघू’ मी राज्यपाल फजल यांना म्हटलं, ‘सर अभी हेलिकॉप्टरमें बैठे है. पंधरा-वीस मिनिटमें पुनामें उतरेंगे. जेजुरीको जाना है.’ पण, ते म्हणाले, ‘ये विपक्ष का खत है, मैं नही आ सकता.’ तेवढ्यात पतंगराव कदम म्हणाले, ‘देखो सर, जानाही है. अभी जानाही पडता है. चलो रे दरवाजा बंद करो,’ असे म्हणून ते राज्यपालांना घेऊन आले. मी जरा नम्रपणे सांगण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र, ते ऐकत नाहीत म्हटल्यावर त्यांनी आपला नेहमीचा खाक्या दाखविला. ही धडाडी कोणामध्ये नव्हती. ती दुसऱ्या कोणामध्ये येणेही शक्य नाही, असेही पाटील यांनी नमूद केले.

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT