Solapur, 23 May : विधान परिषदेच्या निवडणुकीत सर्व विरोधकांची एकत्रित मोट बांधली तरी, ते 100 च्या पुढे जाण्याची शक्यता दिसत नाही. मी परवाच मतदारांची आकडेवारी काढली, त्यात जिल्ह्यात काँग्रेसच्या मतदारांची संख्या पाच आणि MIM ची नऊ आहे, त्यामुळे ते शक्य होणार नाही. विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करून एक आदर्श घालून देऊ, त्यासाठी वेळ पडली तर मी सर्वांशी चर्चा करेन, असे उत्तर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोहिते पाटील यांच्याकडून विरोधकांची मोट बांधण्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर दिले.
विधान परीषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या वतीने मोहिते पाटील (Mohite Patil) परिवाराकडून विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा प्रश्न गोरे यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना बिनविरोध निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सर्व नेत्यांशी चर्चा करण्याची तयारी जयकुमार गोरे यांनी दर्शविली आहे.
जयकुमार गोरे (Jaykumar Gore) म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील सर्व नेत्यांना माझी विनंती आहे. आता सर्व निवडणुका झालेल्या आहेत, त्यामुळे वस्तुस्थिती सर्वांना माहिती आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन जिल्ह्यातून एक आदर्श घालून देऊ आणि विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करू, त्यासाठी वेळ पडली तर मी सर्वांशी चर्चाही करेल. कारण निवडणूक ही आता फक्त औपचारिकता आहे, अशा परिस्थितीत सोलापूर जिल्ह्याने एक नवा इतिहास घडवावा, अशी माझ्यासह अनेकांची भावना आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यासोबत झालेल्या विमान प्रवासाबाबत जयकुमार गोरे म्हणाले, विधानपरिषदेची निवडणूक आता लागलेली आहे आणि त्या अनुषंगाने चर्चा होणार, हे साहजिक आहे. मुंबईहून सोलापूरला येण्यासाठी एकच विमान आहे आणि आम्ही दोघं (राजेंद्र राऊत) आज एकाच विमानात आलो, त्यामुळे त्याची वेगळी चर्चा होण्याची गरज नाही.
भाजपचे अनेक कार्यकर्ते आणि नेते हे या विधान परिषदेसाठी इच्छुक आहेत. कारण, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही प्रचंड मोठ यश मिळवलेलं आहे. आमची संख्या कर्न्मेटेबल आहे, त्यामुळे आमच्या सर्व कार्यकर्त्यांना वाटतं की आमदार होण्याची संधी आहे. त्यामुळे कार्यकर्ता म्हणून त्यांच्या भावना या योग्यच आहेत, असेही गोरे यांनी स्पष्ट केले.
ताईसाहेबांबद्दल आदरानेच बोललोय : गोरे
खासदार प्रणिती शिंदे यांनी पाठविलेल्या नोटिशीबाबतही पालकमंत्री गोरे यांनी भाष्य केले. ते म्हणाले, अजून मला कुठलीही नोटीस मिळालेली नाही. नोटिशीबाबतची बातमीही मी सोशल मीडियावरच बघितली आहे. याच्या पलीकडची माहिती मला नाही. मात्र, आदरणीय ताईसाहेबांच्या बद्दल मी आदरानेच बोललेलो आहे. त्यांना जर वाईट वाटलं असेल तर मला नोटीस आल्यानंतर मी त्याची माहिती घेईल आणि अवश्य उत्तर दिलं जाईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.