Kolhapur Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Lok Sabha News : लोकसभेसाठी तळागाळातील भाजप रस्त्यावर, महाविकास आघाडीमध्ये अजूनही नीरव शांतता

Rahul Gadkar

Kolhapur News : काँग्रेसचे माजी खासदार, तेही अन्य राज्यांतील, त्यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता सापडली म्हणून ऱाज्यात आणि देशात सत्तेत असलेल्या भाजपकडून येथे रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाते. चारपैकी तीन राज्यांच्या निकालानंतर भाजपकडून जल्लोष केला जातो. पण, एका राज्याच्या विजयावर काँग्रेस मात्र शांतच. लोकसभेची निवडणूक जवळ येईल तशी भाजपची जोरदार तयारी सुरू असताना महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट वगळता अन्य दोन पक्षांत शुकशुकाट आहे.

राज्यात भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी अजित पवार गट यांची महायुती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी शरद पवार गट व शिवसेना ठाकरे गट यांची महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) यांच्यात लढ़त निश्चित आहे. विद्यमान दोन्ही खासदार महायुतीसोबत आहेत. त्यांनाच उमेदवारी मिळेल का नाही, याविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहे. पण, या दोन्ही जागांवर उमेदवार कोणीही असला तरी त्या जिंकायच्या या जिद्दीने भाजपने (BJP) जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात वातावरण निर्मिती सुरू केली आहे.

विकसित भारत यात्रेच्या निमित्ताने गावोगावी सरकारची कामे पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. याउलट काँग्रेस (Congress) असेल किंवा राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटात मात्र शांतताच आहे. शिवसेनेच्या (Shiv Sena) अंतर्गत वादातून ठाकरे गट कमी-अधिक प्रमाणात आक्रमक होत असताना त्यांनाही दोन्ही काँग्रेसची साथ मिळत नाही, हे अलीकडेच शहरात घडलेल्या एका प्रकारावरून पाहायला मिळाले, मध्यंतरी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियंक खर्गे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. त्याविरोधात भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.

सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैनिकांच्या गणवेशावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा लावण्याचा निर्णय घेतला, त्याचा आनंदोत्सव भाजप करते. काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या निषेधासाठी भाजप कार्यकर्ते रस्त्यावर येतात. शहराच्या विविध विकासकामांचा पाठपुरावा करण्यासाठी भाजपकडून महापालिका प्रशासकांकडे पाठपुरावा केला जातो. पण, दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी म्हणून सगळीच पराभूत मानसिकतेत असल्यासारखी स्थिती आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 'हर घर राष्ट्रवादी' अभियान सोडले तर नवा कार्यक्रम हातात नाही. काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेऊन कार्यकर्त्यांना 'रिचार्ज’ करण्याचा कार्यक्रम दिसत नाही. सहकारी संस्थांच्या निवडणुकीत सोयीची भूमिका घेऊन आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांचे बस्तान बसवण्यातच इथल्या नेतृत्वाची ताकद पणाला लागताना दिसत आहे. पण, भाजपकडून बूथ लेवल कमिटी, मंडल अध्यक्ष यांच्या बैठका, रोजचे कार्यक्रम यामुळे कार्यकर्तें या ना त्यानिमित्ताने नेहमी सक्रिय होताना दिसत आहेत. अशा जोडण्या आघाडीच्या पातळीवर होताना दिसत नाहीत.

 (Edited By - Rajanand More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT