Neera Canal Water Issue Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Neera Canal Water Issue : माढ्याचे मतदान संपताच नीरा कालव्याचे पाणी बंद; मोहिते पाटलांचा निंबाळकरांवर हल्लाबोल

Vijaykumar Dudhale

Solapur, 14 May : माढा लोकसभा मतदारसंघाचा संपूर्ण प्रचार हा पाण्याभोवतीच केंद्रित होता. लोकसभेचे मतदान संपताच त्याच दिवशी (ता. ७ मे) नीरा उजवा कालव्यातून सोडण्यात आलेले आवर्तन बंद करण्यात आले आणि वादाचा भडका उडाला. ‘विरोधी राजकीय भूमिका घेतल्याने भाजपच्या लाेकप्रतिनिधीने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून पाणी बंद केले आहे,’ असा हल्लाबोल आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केला आहे.

दरम्यान, याच मुद्यावरून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, फलटणचे आमदार दीपक चव्हाण, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, रघुनाथराजे नाईक निंबाळकर, धैर्यशील मोहिते पाटील, उत्तम जानकर, डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत फलटणमध्ये जाऊन जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जलसपंदा विभागाकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे की, फलटण (Phaltan) येथे ४९/९०० किमी येथे नीरा उजवा कालवा (Neera Canal Water ) फुटला आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. या कालव्याची दुरुस्ती करण्यासाठी पाणी बंद करण्यात आले आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. या कामाच्या दुरुस्तीसाठी दहा दिवस लागतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

नीरा उजव्या कालव्यातून सांगोला, माळशिरस आणि पंढरपूरसाठी नियमानुसार आणखी १.२५ टीएमसी पाणी सोडणे आवश्यक होते. हे आवर्तन २० मेपर्यंत चालणार होते. मात्र, माढा लोकसभा मतदारसंघाचे मतदान संपताच त्याच दिवशी (ता. ७ मे) रात्री हे पाणी बंद झाले आहे. या तीनही तालुक्यांचे हक्काचे पाणी त्यांना मिळणे अपेक्षित असताना लवकर बंद केल्याने या तीनही तालुक्यातील शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीत विरोधात राजकीय भूमिका घेतल्यामुळे भाजपच्या लोकप्रतिनिधीने सूडबुद्धीच्या राजकारणातून माळशिरस, सांगोला आणि पंढरपूरचे पाणी बंद केले आहे. आमच्या हक्काचे पाणी न सोडल्यास आम्ही शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन करू. पाणी न सोडल्यास परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा इशाराही आमदार रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitshinh Mohite Patil) यांनी न नाव घेता भाजपचे माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjeetshinh Naik Nimbalkar) यांना दिला आहे.

धैर्यशील मोहिते पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. फलटण आणि माळशिरसचे आमदार या ठिकाणी बसले आहेत. त्यांच्यासमोर तुम्ही खोटे बोलत आहात. दुरुस्तीच्या कामाला जेवढी वाहने लावण्यात आली आहे, असे तुम्ही सांगता तेवढी वाहेन त्या ठिकाणी नाहीत. त्यामुळे या विभागातील सर्वांवर आम्ही हक्कभंग आणायला सांगणार आहोत, असा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, माढ्याचे मतदान संपताच नीरा उजवा कालव्याचे पाणी बंद केल्याने ते माळशिरस, पंढरपूर आणि सांगोला तालुक्यात पेटले आहे. पाणी न सोडल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मोहिते पाटील यांनी दिला आहे. पाणी सोडण्याबाबत जलसंपदा विभागाने कालवा सल्लागार समितीकडे बोट दाखवले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT