Manoj Jarange Patil, Deepak Salunkhe, Chetan Singh Kedar-Savant Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangola Politics : सुपारी घेऊन उमेदवार पाडायला मोगलाई लागली काय? जरांगेंना 288 उमेदवारही मिळणार नाहीत

Sangola Assembly constituency: सांगोला मतदारसंघ हा मूळचा भाजपचा असून 2009 पासून मात्र ही जागा मित्रपक्षाकडे आहे. महायुतीचा अजेंडा घेऊनच भाजप जिल्ह्यात काम करेल.

दत्तात्रय खंडागळे

Sangola, 21 October : सुपारी घेऊन उमेदवार पाडायला काय मोगलाई लागली काय? असा सवाल करीत मनोज जरांगे पाटलांनी उमेदवारी उभे केले, तर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. उलट त्यांना 288 उमेदवार तर मिळू द्या, असा उपरोधात्मक टोला भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी सांगोला येथील पत्रकार परिषदेत लगावला. त्यांच्या या विधानानंतर सोशल मीडियावरील टीका टिपण्णीमुळे चर्चेला उधाण आले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी सांगोल्यात (Sangola) भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या बैठकीत भाजपचे सर्वच पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सांगोला मतदारसंघ मूळ भाजपचा असून तो भाजपलाच मिळावा, असा दावा केला.

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार-सावंत म्हणाले, सांगोला मतदारसंघ हा मूळचा भाजपचा असून 2009 पासून मात्र ही जागा मित्रपक्षाकडे आहे. महायुतीचा (Mahayuti) अजेंडा घेऊनच भाजप जिल्ह्यात काम करेल. महायुतीकडून उमेदवारी मिळत नाही, हे लक्षात आल्यानंतर दीपक साळुंखे यांनी मशाल हातात घेतली आहे. जरांगे फॅक्टर आणि दीपक साळुंखेंच्या मशाल हातात घेण्यामुळे महायुतीवर कसलाही परिणाम होणार नाही.

बैठकीत भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघावर दावा सांगितला आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघ महायुतीतून भाजपला मिळावा, अशी मागणी केली आहे. विकास कामांच्या जोरावर महायुतीचा उमेदवार विक्रमी मतांनी विजयी होईल. गेल्या पाच वर्षांत तालुक्यासाठी साडेपाच हजार कोटींचा निधी मिळाला असून या निधीत भाजपच मोठा वाटा आहे.

सांगोला तालुक्यात विरोधकांना चर्चेला मुद्दाच उरलेला नाही. सांगोल्याची जागा भाजपला मिळावी, यासाठी कार्यकर्ते सातत्याने मागणी करीत आहेत. जरांगे फॅक्टर आणि दीपक साळुंखेंचा महायुतीवर कसलाही परिणाम होणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

मनोज जरांगे-पाटील हे भाजप व विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतात, याचा धागा पकडत जिल्हाध्यक्ष केदार-सावंत म्हणाले, उमेदवार पाडायला काय मोगलाई लागलीय काय? त्यांच्या फॅक्टरचा महायुतीवर काहीही परिणाम होणार नाही. त्यांना 288 जागेवर उमेदवार तर मिळू द्या, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. त्यांच्या या विधानामुळे सोशल मीडियावर जोरदार टीका टिपण्णी होऊ लागली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT