Manoj Jarange Patil- Narendra Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Narendra Patil : जरांगे पाटलांनी ‘तो’ हट्ट धरला अन्‌ ओबीसी-मराठा वाद पेटला; नरेंद्र पाटलांचा आरोप

Vijaykumar Dudhale

Solapur, 16 September : मनोज जरांगे पाटील हे कालपर्यंत समाजसेवा करत होते, ते आता राजकारणात उतरले आहेत. राजकारणामध्ये प्रतिस्पर्धी असतो, अशा शब्दांत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी जरांगे पाटील यांच्या विधानसभा निवडणूक लढविण्याच्या चर्चेवर भाष्य केले.

दरम्यान, हैदराबाद संस्थेने दिलेले मराठा आरक्षण मराठवाड्याला लागू करण्याची मागणी होती. ती मागणी मराठवाड्यापुरती मर्यादित होती. पण, कुणबी दाखले संपूर्ण राज्यात देण्यात यावेत, असा हट्ट धरला, त्यावेळी ओबीसी आणि मराठा वाद पेटला, अशी टीका नरेंद्र पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांचे नाव न घेता केली.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील (Narendra Patil) हे आज सोलापूरच्या (Solapur) दौऱ्यावर होते. माध्यमांशी बोलताना त्यांना मनोज जरांगे पाटील यांच्या निवडणूक लढविण्याच्या चर्चेवर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर नरेंद्र पाटील यांनी जरांगे आता राजकारणात उतरले आहेत, असे स्पष्टपणे सांगितले. यासोबत, माझा मतदारसंघ नक्की नाही. मात्र, माझ्यावर पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे, असेही त्यांनी सांगितले.

बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनाबाबत नरेंद्र पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाचा प्रवास मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केला नाही. मराठा आरक्षणाचा विषय अण्णासाहेब पाटील यांनी सुरू केला आहे. मराठा समाजाला न्याय मिळाला नाही; म्हणून माझ्या वडिलांनी बलिदान दिले आहे.

मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन आणि मागणीच्या माध्यमातून समाजामध्ये वाद झाला. आम्ही पाहिला आहे. कुणाची तुलना करण्यापेक्षा मराठा समाजाला आरक्षण द्यायला पाहिजे, अशी भूमिकाही नरेंद्र पाटील यांनी मांडली.

राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर टीका करताना नरेंद्र पाटील म्हणाले, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे भारताबाहेर जाऊन चांगल्या गुणांवर न बोलता वाईट गुणांवर बोलतात. राहुल गांधी यांनी वेगवेगळ्या प्रकारे भारताची निंदा केली आहे.

राज्यात मराठा आरक्षण विषय सुरु आहे. देशात आजही अनेक जाती आरक्षणापासून वंचित आहेत. मात्र, परदेशात जाऊन राहुल गांधी आरक्षणाबाबत बोलतात, हे योग्य नाही, असेही नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले.

खासदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या नेत्याला राहुल गांधी यांना अवगत करावं, एवढी आमची विनंती आहे. येत्या 21 आणि 22 तारखेला सोलापूर आणि बार्शी येथे यशस्वी मराठा उद्योजकांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अनेक लाभार्थ्यांना लाभ झाला आहे. आघाडीच्या काळात मराठा समाजासाठी कोणतेच निर्णय घेतले नाहीत, असा आरोपही नरेंद्र पाटील यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT