manoj jarange, patil Shambhuraj Desai sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी अध्यादेश निघणार, मंत्र्याने दिली महत्त्वाची माहिती

उमेश भांबरे :सरकारनामा

Satara : मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलन करणार आहेत. 20 जानेवारीपासून जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघतील. त्यांच्यासोबत मराठा समाजातील लाखो बांधव असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारकडून जरांगे यांची समजूत घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातच मंत्री शंभूराज देसाई यांनी मराठा आरक्षणा संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.

मनोज जरांगे (Manoj jarange) यांच्या मागणीनुसार 90 टक्के प्रश्न सुटले आहेत. आता उर्वरित 10 टक्के निर्णय होणे बाकी आहे. सगेसोयरे बाबत कायदेशीर सल्ला घेऊन मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून आम्ही अध्यादेश काढू. त्यामुळे जरांगे पाटील यांनी मुंबईतील आंदोलन स्थगित करावे, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी केले आहे.

मनोज पाटील जरांगे यांनी मुंबईत आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे. आरक्षण प्रश्नावर सरकारची भूमिका सकारात्मक आहे. त्यांनी सुरवातीला हे आंदोलन हाती घेतले त्यावेळी मराठवाडा येथील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे हा विषय घेतला. त्यानंतर त्या भागात शासनाने नोंदीची शोध मोहीम सुरू केली. त्यानंतर त्यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यात कुणबी नोंदी शोधून त्यांनाही प्रमाणपत्र देण्याची मागणी केली. त्यासाठी सर्व जिल्ह्यात कुणबी नोंदी शोध मोहीम शासनाने सुरू केल्या. ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना दाखले देण्यास सुरुवात केली, असे शंभूराज देसाई यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जरांगे यांनी मराठ्यांतील सगेसोयरे यांनाही प्रमाणपत्र द्या, अशी मागणी आहे. याबाबत ॲडव्होकेट जनरल यांच्याशी चर्चा करुन कायदेशीर बाबीं तपासून मंत्रीमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा होईल. त्यानंतर याबाबतचा अध्यादेश काढण्यात येईल.मुंबईत येऊन आंदोलन करण्यामुळे मुंबईकरांची गैरसोय होणार आहे. तसेच तेथे इतक्या मोठ्याप्रमाणात समाज आल्याने लोकांची गैरसोय होणार आहे. सरकारने आरक्षणाबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे लोकांची गैरसोय टाळण्यासाठी जरांगे पाटील यांनी आंदोलनाची भूमिका बदलावी, असे आवाहन देसाई यांनी केले.

जरांगेंसोबत मैत्री

मनोज जरांगे यांनी राज्य सरकारमधील मंत्री ट्रॅप लावत असल्याचा आरोप केला होता. त्यावर शंभूराजे देसाई म्हणाले, आमच्यातील कोणीही मंत्री असे काही करणार नाही. त्यांना ही माहिती कोठून मिळाली ते त्यांनी मला सांगावे. कारण जरांगे पाटील यांच्याशी माझी चांगली मैत्री आहे. 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या तरी घाईगडबडीत प्रमाणपत्र देता येणार नाही कराण उद्या त्यावर न्यायालयात आव्हान दिले गेले तर सर्वांचीच अडचण होईल, असे देखील देसाई म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT