Jayakwadi Water Issue : Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jayakwadi Water Issue : आमदार काळेंचा इशारा; 'नगरच्या हक्काचं पाणी जायकवाडीला सोडणार नाही...'

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत समन्यायी पाणी वाटप कायद्याला विरोध करून जायकवाडीला पाणी

न सोडण्याचा ठराव मंजूर करून घेणार असल्याचे अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले आहे. काळे यांनी जायकवाडी प्रश्नावर आग्रही भूमिका घेत नगर-नाशिक जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांना भेटून एकीची मोट बांधण्यात पुढाकार घेतला आहे. (Latest Marathi News)

16 नोव्हेंबर रोजी नगरमध्ये होणाऱ्या कालवा सल्लागार समिती बैठक पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. बैठकीला जलसंपदा, पाटबंधारे विभागाचे अधिकारी-अभियंते यांच्यासह नगर जिल्ह्यातील उत्तरेतील भंडारदरा लाभ क्षेत्रातील साखर कारखान्यांचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक उपस्थित असणार आहेत. सध्या नगर-नाशिक विरुद्ध मराठवाडा असा पाणी संघर्ष पेटलेला असताना जिल्ह्यातील तालुका-तालुक्यातील नेतेही आपापसात आरोप-प्रत्यारोप करण्यात मग्न आहेत. अशात 16 तारखेला होणाऱ्या कालवा सल्लागार समितीची बैठक वादळी होणार अशीच परिस्थिती आहे.

मात्र आमदार आशुतोष काळे यांनी नगर-नाशिकचे जायकवाडीला जाणारे धरण समूहातील पाणी जिल्ह्यातच राहिले पाहिजे यावर भर दिला असून त्या दृष्टीने कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठराव मंजूर करून घेऊन कायदेशीर बाजू मजबूत करण्यावर भर दिला आहे. राजकीय एकीतून सरकारवर दबाव वाढवणे याच बरोबर न्यायालयात मुद्यांच्या आधारे कायदेशीर लढाई लढण्यावर त्यांनी भर दिला आहे.

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने नुकताच ३० ऑक्टोबर रोजी कुठलीही शहानिशा न करता नगर-नाशिक जिल्ह्यातील धरणातील पाणी जायकवाडीला सोडण्याचा निर्णय दिला होता. त्या निर्णयाविरोधात नगर-नाशिकच्या धरणातून जायकवाडीला पाणी जावू नये यासाठी दिलेल्या न्यायालयीन लढ्याची व पाठपुराव्याची माहिती आमदार काळे यांनी माध्यमांना दिली.

कालबाह्य झालेल्या मेंढेगिरी समितीच्या अहवालाच्या आधारे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने २०१४ च्या आदेशाची अंमलबजावणी करू नये व जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचा फेर निर्णय येत नाही, तोपर्यंत समन्यायी पाणी वाटपाच्या नावाखाली जायकवाडीला पाणी सोडण्यात येऊ नये, असा आदेश उच्च न्यायालयाने दिलेला आहे. त्यालाच भक्कमपणे जोड देत आमदार आशुतोष काळे यांनी न्यायालयाच्या अत्यंत महत्वाच्या निर्देशांचा आधार घेवून नगर-नासिकच्या धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय घेण्याची गरज असेल तर तसा निर्णय फक्त दुष्काळी परिस्थितीमध्ये घेण्यास सांगितले आहे.

सद्या जायकवाडी धरणात पुरेशा प्रमाणात पाणी साठा (जवळपास ५७ टक्के पेक्षा जास्त) उपलब्ध असतांना पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे न्यायालयाचा अवमान झालेला आहे. त्यामुळे हा निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध तसेच या प्रक्रियेमध्ये जे कोणी सहभागी होतील त्यांच्यावर देखील अवमान याचिका दाखल करण्याचे सुतोवाच काळे केले. त्याला जोडूनच काळे यांनी नगर मध्ये होणाऱ्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत जायकवाडी पाणी न सोडण्याचा ठराव मंजूर करून घेणार, असा निर्धार व्यक्त केला आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT