Pandharpur, 23 March : सोलापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या आमदारांमधील धूसफूस अखेर बाहेर आली आहे. पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या मराठा महासंघाचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात बोलताना मोहोळचे राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार राजू खरे यांनी सांगोल्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. सत्तेच्या जवळ गेलेले डॉ. बाबासाहेब देशमुख हे बहुजन आणि धनगर समाजाचे नेते राहिलेले नाहीत, ते आता ब्राह्मण समाजाचे नेते झाले आहेत, असा घणाघाणात आमदार खरे यांनी केला.
सोलापूर जिल्ह्यातून महाविकास आघाडीचे आणि आघाडीने पाठिंबा दिलेले सहा आमदार निवडून आले आहेत. यामध्ये माळशिरसमधून उत्तम जानकर, करमाळ्यात नारायण पाटील, माढ्यातून अभिजीत पाटील, मोहोळमधून राजू खरे हे राष्ट्रवादीचे, तर बार्शीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिलीप सोपल आणि सांगोल्यातून शेतकरी कामगार पक्षाचे डॉ. बाबासाहेब देशमुख (Babasaheb Deshmukh) हे निवडून आले आहेत. मात्र, यातील डॉ. देशमुख हे सत्ताधारी भाजपकडे झुकल्याचा अप्रत्यक्ष टोला आमदार राजू खरे यांनी देशमुखांना लगावला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी अण्णासाहेब पाटील यांनी बलिदान दिले. त्यांची बलिदानाची आठवण आजही कायम आहे. मी यापूर्वीही मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी भूमिका मांडलेली आहे. तीच भूमिका आजही कायम आहे. पण, महायुतीचे सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही. मराठा समाजाला आरक्षणासाठी संघटितपणे सरकारच्या विरोधात लढावे लागेल. मराठा समाजाच्या सोबत आम्ही कायम राहणार आहोत, असेही राजू खरे (Raju Khare) यांनी स्पष्ट केले.
आमदार राजू खरे म्हणाले, राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आहे, या सरकारकडे पाशवी बहुमत आहे. तब्बल २३४ आमदारांंचं पाठबळ असल्यामुळे हे सरकार आम्हाला म्हणजेच विरोधकांना सभागृहात बोलूही देत नाही. आमचा आवाज दाबवण्याचा प्रयत्न सत्ताधारी लोकांकडून होत आहे. समाधान आवताडे हे सत्ताधारी भाजपचे आमदार आहेत. त्यांची अडचण मोठी अडचण होते आहे, आमची होत नाही.
आमदार नारायण पाटील, उत्तम जानकर, अभिजीत पाटील, आम्ही सरकारच्या विरोधात लढत आहोत. मात्र, सांगोल्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख हे मात्र आमच्यापासून फटकून राहतात. विधानसभेत तब्बत 50 वर्षांहून अधिक काळ सांगोेल्याचे नेतृत्व केलेले (कै.) गणपतराव देशमुख हे बहुजन समाजाचे आणि धनगर समाजाचे मोठे नेते होते. परंतु त्यांचा नातू आमदार डाॅ. बाबासाहेब देशमुख हे बहुजन आणि धनगर समाजाचे नेते राहिलेले नाहीत. ते आता ब्राम्हण समाजाचे नेते झाले आहेत. सत्तेच्या जवळ गेल्यामुळे डॉ. बाबासाहेब आमच्यापासून फटकून राहतात, असा टोला त्यांनी लगावला.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.