Prajakta Tanpure News  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Prajakta Tanpure News : प्राजक्त तनपुरेंनी शिक्षणमंत्री केसरकरांना सुनावलं; शाळाबाह्य कामांवर आक्षेप

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar: राहुरी तालुक्यातील वळण येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक सेमी इंग्लिश स्कूलच्या शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना पत्र लिहून शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या शाळाबाह्य कामांमुळे अध्यापनावर दूरगामी परिणाम होत असल्याचे सांगितले आहे. ही शाळाबाह्य कामे त्वरित थांबवली जावीत, अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा पत्रात दिला आहे. या पत्राच्या अनुषंगाने आमदार प्राजक्त तनपुरे यांनीही शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या शाळाबाह्य कामांवर आक्षेप घेत सरकारला चांगलेच सुनावले आहे.

वळण येथील जिल्हा परिषदेच्या शाळा व्यवस्थापन समितीद्वारे दीपक केसरकर यांना लिहिलेले पत्र वाचुन, गुरूला देवाचे स्थान देणाऱ्या आपल्या संस्कृतीला काळीमा फासणारी, आजच्या काळातील शिक्षकांची आगतिकता या पत्रातून व्यक्त होताना दिसत असल्याचे तनपुरे यांनी म्हटले आहे.

ज्ञानदानाच्या कार्यात स्वतःला अखंड वाहून घेतलेले असंख्य शिक्षक आहेत. त्यांच्यावरच भविष्यातील पिढी घडविण्याची धुरा आहे. मात्र, दुर्दैवाने शासनाने शिक्षकांना हे कार्य सोडून इतर सर्व कामांना जुंपले आहे. काळाप्रमाणे शिक्षण पद्धती बदलत चालली आहे. या बदलत्या शिक्षणाला साजेसे असे शिक्षक तयार करणे हे सरकारचे प्राधान्य असले पाहिजे. मात्र, आपली आहे ती कामे उरकण्यासाठीचे कर्मचारी या दृष्टिकोनातून शिक्षकाला दुय्यम स्थान दिले जात असल्याचा आरोप तनपुरे यांनी केला आहे.

शाळाबाह्य कामांची मोठ्या यादीमुळे अध्ययन आणि अध्यापन यावर दुरोगामी परिणाम होताना दिसत आहेत. मोठ्या शाळांची फी न परवडणाऱ्या गरीब मुलांचे, खासकरून ग्रामीण भागातील मुलांचे भवितव्य अंधारले आहे. शिक्षण क्षेत्राचे पावित्र्य जपण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केली आहे.

शाळा व्यवस्थापन समितीने काय म्हटले आहे पत्रात??

महाराष्ट्र राज्यातील सर्व सरकारी शाळेतील शिक्षकांना मुलांना शिकवण्याव्यतिरिक्त B. L. O. निवडणूक कामे, निरक्षर सर्वेक्षण, शाळाबाह्य सर्वेक्षण, शालेय पोषण आहार शिजविणे, रेकॉर्ड ठेवणे, सरल पोर्टल तसेच रोजरोजची नवनवीन परिपत्रके, ऑनलाइन त्वरित अहवाल मागविणे यांसारखी बहुतांशी कामे शिक्षकांवर सोपविण्यात आली आहेत. त्यामुळे शिक्षणाचा मूळ उद्देश सोडून इतर कामात बहुतांशी वेळ जात आहे. त्यामुळे त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर थेट परिणाम होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान रोखण्यासाठी शिक्षणाव्यतिरिक्त शिक्षकाची शाळाबाह्य कामे काढून घ्यावेत, अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्यात येईल. सदर अर्जाचा आपण गांभीर्यपूर्वक विचार करावा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT